विदर्भा नदीला मिळाले ‘जीवनदान’
By Admin | Updated: June 16, 2016 02:54 IST2016-06-16T02:54:15+5:302016-06-16T02:54:15+5:30
येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीची पाणी पातळी खालावल्याने नदीचे लोकसहभागातून खोलीकरण करण्यात आले.

विदर्भा नदीला मिळाले ‘जीवनदान’
लोकसहभाग यशस्वी : पात्रही वाढले, पाण्याच्या पातळीत झाली वाढ
घोन्सा : येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीची पाणी पातळी खालावल्याने नदीचे लोकसहभागातून खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे या नदीला जीवनदान मिळाले असून पाण्याची पातळीही वाढली आहे.
या नदीत मोठ्या प्रमाणात बेशरमाची झुडुपे वाढली होती. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होत होता. त्याचबरोबर नदीचे पात्रही दिवसेंदिवस लहान होत होते. येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी लोकसहभागातून या नदीचे रूंदीकरण व खोलीकरण करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात ग्रामस्थांना नळाद्वारे मुबलक पाणी मिळावे, त्यांना पाण्याचे चटके सहन करावे लागू नये, याची जाण ठेवून जेसीबी मशिनच्या सहाय्याने खोलीकरण करण्यात आले.
पावसाळ्यात या नदीला दरवर्षी पूर येतो. मात्र नदीचे पात्र लहान व नदीचे खोलीकरण न झाल्यामुळे काही दिवसानंतर पाण्याची पातळी खालावते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी खोलीकरणासाठी सहभाग दर्शविला. या खोलीकरणासाठी विलास डाहुले, संजय सपाट, सुनील मत्ते, दिलीप काकडे, सरपंच निरूपमा पथाडे, उपसरपंच अनिल साळवे, विश्रांत पथाडे, रमेश काकडे, पांडुरंग निकोडे, विलास कोटरंगे, सचिन उपरे, अशोक गाते व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
आता या नदीचे पात्र वाढले असून पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. लगतच्या कुंभारखणी येथील भूमिगत कोळसा खाणीच्या प्रबंधकांना या नदीत खाणीतील पाणी फिल्टर करून सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार वेकोलितर्फे दिवस-रात्र या नदीत पाणी फिल्टर करून सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाणी दिसून येत आहे. या खोलीकरण व रूंदीकरणामुळे भविष्यात घोन्सा व नदी काठावरील गावात पाणी टंचाईचे चटके बसणार नाही, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)