नांदेपेरा : सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. त्यामुळे शासनाने पैसेवारीचे ढोंग करून शेतकऱ्यांना वेठीस न धरता सरसकट आर्थिक मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.गेल्या काही वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षीपासून शेती उत्पादनात घट येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनच पार कोलमडले आहे. त्यातच शासनाकडून आणेवारीची सबब पुढे करून वेळ मारून नेली जात आहे. शासनाने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग न करता प्रत्यक्ष सढळ हाताने मदत करावी, अशी वणी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांसमोर भीषण दुष्काळ उभा ठाकल्याने कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहे. याचे गांभीर्य शासनाने अद्याप ओळखले नाही. शेतकऱ्यांना पडतीच्या काळात सढळ हाताने मदत करणे शासनकर्त्याचे कर्तव्य आहे. अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस न धरता सरसकट आर्थिक मदत करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. निसर्गामुळे शेतकरी हतबदल ठरला आहे. पावसाची दडी, अनेक पिकांवर आलेल्या रोगांच्या आपत्तीनंतर आता शासकीय आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तालुक्यातील सर्वच गावात दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली आहे. हे स्पष्टपणे दिसत असतानाही प्रशासनाकडून पैसेवारीच्या माध्यमातून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. पैसेवारीचे ढोंग न करता शेतकऱ्यांना तत्काळ शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)
त्रस्त बळीराजाला हवी मदत
By admin | Updated: December 18, 2014 02:26 IST