वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी तालुक्यात संततधार
By Admin | Updated: September 1, 2014 23:56 IST2014-09-01T23:56:54+5:302014-09-01T23:56:54+5:30
गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या दडीने करपणारी पिके आता टवटवीत दिसू लागली आहे.

वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी तालुक्यात संततधार
वणी : गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या दडीने करपणारी पिके आता टवटवीत दिसू लागली आहे. या संततधार पावसाने या चारही तालुक्यातील नदी, नाले, ओढे, लघु व मध्यम प्रकल्पही प्रथमताच भरले आहेत.
यावर्षी सुरूवातीच्या मृग नक्षत्रापासून पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत आणि कोरड्या दुष्काळात सापडले. कपाशीची वाढच खुंटल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. या कोरड्या दुष्काळातच यंदा शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी कपाशीची सीतादही करीत होते. व्यापारीही त्याचवेळी कापूस खरेदी सुरु करीत होते. मात्र यावर्षी दसऱ्याला कापूस निघणे अवघड झाले आहे.
अत्यंत निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना पोळ्याच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. पोळ्याच्या दिवशी सोमवारी सायंकाळी हजेरी लावली. त्यानंतर गेले चार दिवस सतत पाऊस कोसळत आहे. शनिवारी आणि रविवारी तर दमदार पाऊस झाला. वणी तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी तब्बल ८0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर रविवार सकाळपासून आज सोमवार सकाळपर्यंत पुन्हा ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वणी तालुक्यात यावर्षी आजपर्यंत ५८३ मिलीमीटर पऊस झाला. मागीलवर्षी याच काळात तब्बल एक हजार ३५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, हे विशेष.
पोळ्यापासून पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी खरीप पिकांना लाभ झाला आहे. मात्र कपाशीची वाढ खुंटल्याने कपाशीचे पीक अद्याप संकटात आहे. शेतकऱ्यांची आशा सोयाबिनवर टिकून आहे. दरवर्षी दसऱ्यापासून कापूस वेचणीला सुरूवात होते. सीतादहीचा कापूस उच्च प्रतीचा असल्याने त्याला दरही चांगले मिळतात. त्यातूनच शेतकरी दसरा, दिवाळी सण साजरे करतात. तथापि यावर्षी पावसाच्या विलंबाने विजयादशमीला सीतादही होणे अवघड झाले आहे. पावसाच्या दडीने उत्पन्नातही घट येण्याची शक्यता कायमच आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील नदी, नाले, ओढे, लघु व मध्यम प्रकल्प भरले. मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प आणि पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण भरले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)