सौरऊर्जा पंपाने शाश्वत सिंचनाचा प्रयोग
By Admin | Updated: August 23, 2015 02:34 IST2015-08-23T02:34:15+5:302015-08-23T02:34:15+5:30
राज्य शासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा पंप शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ हजार ४२० सौरपंप वितरित केले जाणार आहे.

सौरऊर्जा पंपाने शाश्वत सिंचनाचा प्रयोग
शेतकऱ्यांचा हिस्सा पाच टक्के : पाच वर्षांपर्यंत होणार मोफत देखभाल आणि दुरुस्तीही
सुरेंद्र राऊत यवतमाळ
राज्य शासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा पंप शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ हजार ४२० सौरपंप वितरित केले जाणार आहे. सौरपंपामुळे शाश्वत सिंचनाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. या पंपासाठी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातून अर्ज वितरण करण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सौरपंप निवडण्यासाठी एसी आणि डीसी पंप, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.
शासनस्तरावरून सौरपंप वितरणासाठी काही कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपनीकडूनच शेतकऱ्यांना सौरपंप देखभाल दुरुस्तीची सेवा मिळणार आहे. शासन सौरपंपाचा मोबदला हा दोन टप्प्यात देणार आहे. पहिल्या टप्प्यात पंपाच्या ६० टक्के रक्कम दिली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित ४० टक्के रक्कम पाच वर्षात सुलभ हप्त्याने दिली जाणार आहे. देखभाल दुरूस्ती सेवा नियमित मिळावी यासाठी ही सोय शासनाने केली आहे. शेतकऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परंपरागत विजेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सौरपंपामुळे भारनियमनाच्या कटकटीतून सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना तीन, पाच आणि सात एचपीचा पंप केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून मिळणार आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरत असलेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातून अर्ज घेणे सुरू केले आहे. या अर्जावर सौरपंपाचे एसी आणि डीसी पंप असे दोन पर्याय ठेवले आहे. या दोन प्रकाराच्या पंपात मोठा फरक आहे. अश्वशक्तीसोबतच त्यातून दर तासाला होणार पाण्याचा विसर्ग यावरून या दोन पंपामध्ये फरक आहे. सूर्य प्रकाशापासून तयार झालेल्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करणाराच पंप योग्य ठरणार आहे. नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे शेतकऱ्यामध्येही कुतूहल आहे. कमी उन्हातही पंप चालला पाहिजे, योग्य दाबात पुरवठा कसा होईल, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याचे निराकरण करण्यासाठी प्रिमीयर सोलार सिस्टीम हैदराबादचे अध्यक्ष सुरेंद्र पालसिंग सालुजा यांनी शंकाचे निरासन केले आहे.
केंद्र सरकारच्या प्रयोग शाळेतून या सौरपंपाची तपासणी करून त्याला प्रमाणित केले असणे आवश्यक आहे. सध्या राजस्थानमध्ये ४०० डीसी पंप, ओरिसामध्ये ३०० आणि उत्तर प्रदेशात २००० हजार डीसी सौरपंप कार्यरत असल्याचे सालुजा यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी साधारणत: पाच एचपीचा सबमर्सीबल डीसी पंप वापरावा असेही त्यांनी सांगितले. या पंपाची किंमत जास्त असली तरी देखभाल दुरूस्ती खर्च कमी आहे. या तांत्रिक बाजू शेतकऱ्यांनी समजूनच पंपाची निवड करावी, असे सालुजा यांनी सांगितले.
डीसी आणि एसी पंपात असा आहे फरक
डीसी पंप म्हणजे, ज्यात सौर पॅनलवरून तयार झालेली ऊर्जा थेट पंपाला मिळते. याच ऊर्जेवर हा पंप काम करतो. सकाळी आठ नंतरच्या उन्हातही हा पंप सुरू होऊ शकतो. सायंकाळी उशिरापर्यंत हा पंप काम करू शकतो. एसी पंपामध्ये सौर पॅनलपासून आलेली ऊर्जा थेट पंपमध्ये जात नाही. मध्ये इनव्हर्टर बसविण्यात येतो. या इनव्हर्टरमध्ये पॅनलमधून आलेला डीसी प्रवाह हा एसीमध्ये रुपांतरीत केला जातो. त्यानंतर हा पंप सुरू होतो. सकाळच्या कोवळ््या उन्हात हा पंप सुरू होण्यासाठी वेळे घेतो. सायंकाळीसुध्दा लवकरच बंद होतो. दोन्ही पंपामधून एका तासाला सारखेच पाणी विसर्ग होते. डीसीपंप हा बोअरमध्येही काम करू शकतो.