पुसद तालुक्यात युरियाचा काळाबाजार
By Admin | Updated: September 5, 2014 00:08 IST2014-09-05T00:08:18+5:302014-09-05T00:08:18+5:30
गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने तालुक्यात युरियाची मागणी वाढली आहे. परंतु पुरवठा कमी असल्याने युरियाचा काळाबाजार सुरू आहे. काही कृषी केंद्र चालक २९८ रुपयांची पावती फाडून प्रत्यक्षात

पुसद तालुक्यात युरियाचा काळाबाजार
पुसद : गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने तालुक्यात युरियाची मागणी वाढली आहे. परंतु पुरवठा कमी असल्याने युरियाचा काळाबाजार सुरू आहे. काही कृषी केंद्र चालक २९८ रुपयांची पावती फाडून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांकडून ४०० रुपये घेत असल्याची माहिती आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी केंद्र चालकांकडून पिळवणूक होत आहे.
कृषी अधिकाऱ्याच्या डोळ्यादेखत हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. युरियाच्या दराविषयी शेतकरी कृषी केंद्र चालकांना विचारतात. परंतु युरियाचा साठाच नसल्याचे ते सांगतात. मात्र वाढीव पैसा दिल्यास तोच युरिया शेतकऱ्यांना दिला जातो. एक दोन पोते युरिया घेणाऱ्या शेतकऱ्याला ४०० रुपये व दहा ते १५ पोते घेणाऱ्याला ३७० रुपये आणि त्यापेक्षा अधिक पोते घेतल्यास ३५० रुपये दराने युरिया विकला जात आहे.
याबाबत काही शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र कुणीही दखल घेतली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्या संघटनाही गप्प बसून असल्याचे शेतकरी सांगत आहे. याबाबत कृषी विक्रेता संघाशी संपर्क साधला असता सध्या युरियाची टंचाई आहे.
अमरावती, नांदेड येथून युरिया आणावा लागत आहे. मध्यंतरी पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे युरियाला फारशी मागणी नव्हती. आता पाऊस झाल्याने युरियाची मागणी वाढली आहे. त्यात युरिया साठा कमी असल्याने काही व्यापारी अधिक पैशाची मागणी करीत आहे. परंतु जास्तीत किमतीत कुणीही विकत नाही.
ग्रामीण भागातील कृषी केंद्रात अधिक भाव असू शकतो. ३४० पेक्षा अधिक किंमतीत युरिया विकला जात असेल तर कृषी विक्रेता संघटना आणि संबंधित दुकानदाराला तंबी दिली जाईल, अशी मागणी कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष सुधीर पळसकर यांनी सांगितले. तसेच तालुका कृषी अधिकारी कावळे यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यात अधिक किमतीत युरियाची विक्री होत असेल तर ते बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करावी, त्याची दखल घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)