उमरखेड नगरपरिषदेचा कारभार ढेपाळला

By Admin | Updated: June 16, 2014 23:45 IST2014-06-16T23:45:52+5:302014-06-16T23:45:52+5:30

येथील नगरपरिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. जिल्ह्यात राजकीय स्थैर्य मिळालेली ही एकमेव नगरपरिषद आहे. मात्र त्यानंतरही उल्लेखनीय असे काम येथील पदाधिकाऱ्यांना करता आलेले नाही.

Umberkhed Municipal Council imposed the charge | उमरखेड नगरपरिषदेचा कारभार ढेपाळला

उमरखेड नगरपरिषदेचा कारभार ढेपाळला

उमरखेड(कुपटी) : येथील नगरपरिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. जिल्ह्यात राजकीय स्थैर्य मिळालेली ही एकमेव नगरपरिषद आहे. मात्र त्यानंतरही उल्लेखनीय असे काम येथील पदाधिकाऱ्यांना करता आलेले नाही. शहराच्या विकासाचा पुरता बोजवारा उडाला आहे. स्थानिक आमदार काँग्रेसचे असून राज्यातील सरकारही काँग्रेसचे आहे. अशा स्थितीत विशेष निधी आणून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरात राबविले जातील, अशी अपेक्षा उमरखेडवासीयांना होती. मात्र प्रत्यक्षात सर्वांचाच अपेक्षाभंग झाला आहे. नगरपरिषदेचे दैनंदिन कामकाजही व्यवस्थितरीत्या होत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहे.
उमरखेड शहराला पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. येथील मंदिर ही खरी शहराची ओळख आहे. अध्यात्मिक वारसा असलेल्या या शहराला आता घाणीचा कलंक लागला आहे. शहराचे सुशोभिकरण तर दूरच आहे त्या वस्त्यांमध्येही मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यात नगरपालिका प्रशासन पूर्णत: अपयशी ठरत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे पदाधिकारीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
शहरातील चौक, मुख्य बाजारपेठेचा परिसर, घाणीने बरबटलेला आहे. पावसाळ्यापूर्वी आरोग्यास उद्भवणारा धोका लक्षात घेता नगरपरिषदेने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र याबाबत कोणतेही नियोजन अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. शहरातील या स्थितीबाबत पालिका सभागृहातही विरोधी नगरसेवकही भक्कमपणे बाजू मांडताना दिसत नाही. अगदी क्षुल्लक वाटणारे दैनंदिन काम दुरोगामी परिणाम करणारे आहेत. आज पावसाळ्यापूर्वी शहरातील अंतर्गत नाल्या साफ नसल्यामुळे पावसाचे पाणी नाल्यांमध्ये शिरून घाण रस्त्यावर पसरण्याची भीती आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून मागणी करूनही कार्यवाही होत नाही. शहरातील पथदिव्यांचीही अवस्था गंभीर आहे. बऱ्याच ठिकाणी पथदिवे बंद राहतात तर काही ठिकाणी दिवसा पथदिवे सुरू असल्याचेही अनेकदा आढळून आले आहे. या नियोजनशून्यतेमुळे पालिका प्रशासनाला नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शहर सौंदर्यीकरणाचा गाजावाजा होत असला तरी शहरातील हिरवळ मात्र दुर्मिळ होत चालली आहे. आज अस्तित्वात असलेल्या वृक्षांचीही अधिकृत आकडेवारी पालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. या वृक्षाच्या संगोपनासाठी कुठलीच विशेष दक्षता घेण्यात आलेली नाही. शहरातील पाणीटंचाईची समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून कायम आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना नेहमीच पर्यायी व्यवस्था करावी लागते. तर शहरातील काही भागांमध्ये रात्र जागून पाण्याची तजवीज केली जाते. या समस्येत महिला वर्ग भरडला जात आहे. नगरपरिषदेत गेल्या अडीच वर्षात कुठलेही ठोस काम झालेले नाही. वित्त आयोगातून आलेला निधी विविध कंत्राटातच जिरविला जातो. याचा उपयोग आणखी चांगल्या पद्धतीने करण्याची गरज आहे. नगरपरिषदेचा बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग यामध्ये समन्वय नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहर विकासासाठी या सर्व समित्यांमध्ये समन्वय निर्माण करून योग्य नियोजनाची गरज आहे. जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता तरी या पौराणिक शहराला स्वच्छ सुंदर शहर अशी ओळख मिळवून देण्याची गरज आहे. याशिवाय शहरातील नगरपरिषद शाळांमध्येही शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आणखी प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच शाळांमध्ये पटसंख्येच्या अभावाने ती वाढविण्यासाठी शिक्षकांनी पालकवर्गांमध्ये शाळेच्या दर्जाबाबत विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून प्रयत्न सध्यातरी होत नाही. (वार्ताहर)

Web Title: Umberkhed Municipal Council imposed the charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.