उमरखेड तालुक्यात कोरोना सावटात बेरोजगार युवकांवर आले गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:19+5:30
आधुनिक काळात युवकांचा कल ऑनलाईन पद्धतीकडे वाढला आहे. एका हातात अॅन्ड्रॉईड मोबाईल युवक फिरताना दिसत आहे. मात्र त्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शासन त्यांना रोजगार देऊ शकत नाही. यामुळे अनेक तरुणांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. यातूनच काही युवक व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र शहर व तालुक्यात दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : कोरोनाच्या सावटात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांवर गंडांतर आले आहे. हाताला काम मिळत नसल्याने युवक हताश होत आहे. याशिवाय शेतकरी आणि सामान्य नागरिकही कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झाले आहे.
आधुनिक काळात युवकांचा कल ऑनलाईन पद्धतीकडे वाढला आहे. एका हातात अॅन्ड्रॉईड मोबाईल युवक फिरताना दिसत आहे. मात्र त्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शासन त्यांना रोजगार देऊ शकत नाही. यामुळे अनेक तरुणांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. यातूनच काही युवक व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र शहर व तालुक्यात दिसून येत आहे. शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या आपल्या आई, वडिलांना सहकार्य करण्याची भरपूर इच्छा आहे. मात्र ऑनलाईन व्यवस्थेमुळे व्यापार ठप्प पडत आहे. याच ऑनलाईनमुळे स्थानिक रोजगार हिरावले जात आहे. परिणामी आर्थिक उत्पन्नाचे मार्ग हळूहळू बंद होत आहे.
शासन ऑनलाईन व कॅशलेस व्यवहारांवर भर देत आहे. एक प्रकारे ऑनलाईन आणि कॅशलेस व्यवहार करण्याची सक्ती केली जात आहे. याकडे युवक आकर्षित होत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शासनाची नोकर भरती ठप्प पडली आहे. त्यामुळे युवक बेरोजगार आहे. खासगी शाळांवर कार्यरत युवा शिक्षक तुटपुंजा मानधनावर काम करीत आहे. शासकीय नोकरीची अपेक्षा फोल ठरत आहे. यामुळे युवकांचा हिरमोड होत आहे. परिणामी वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक युवक विविध मोर्चा, धरणे, आंदोलन आदींमध्ये गुरफटत आहे.
चौकाचौकात सुशिक्षित बेरोजगारांचे घोळके दिसून येत आहे. यातून चिडीमारीचे प्रमाण वाढत आहे. युवकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या पालकांचा जीव कासावीस होत आहे. कोरोनाच्या सावटात ही समस्या आणखी बिकट झाली आहे. आधीच बेरोजगार असलेल्या युवकांमध्ये आता नवीन बेरोजगारांची भर पडत आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प पडल्याने तेसुद्धा बेरोजगार झाले आहे.
साखर कारखाना तीन वर्षांपासून बंदच
तालुक्यासाठी कामधेनू ठरलेला पोफाळीचा वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. या कारखान्यावर अनेकांची उपजीविका चालत होती. कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील किमान १०० युवक रोजगाराच्या शोधात आहे. लोकप्रतिनिधी आणि शासन उदासीन असल्याने युवक, शेतकरी, व्यावसायिक सर्वच त्रस्त आहे.