दोन हजार ५० गावांनी घेतली स्वच्छतेची शपथ
By Admin | Updated: October 3, 2014 02:11 IST2014-10-03T02:11:48+5:302014-10-03T02:11:48+5:30
महात्मा गांधीच्या जयंती दिनापासून स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ करण्यात आला. आज पहिल्याच दिवशी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

दोन हजार ५० गावांनी घेतली स्वच्छतेची शपथ
यवतमाळ : महात्मा गांधीच्या जयंती दिनापासून स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ करण्यात आला. आज पहिल्याच दिवशी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. या अभियानाला सुरवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. वर्षातील १०० दिवस श्रमदान करण्याची प्रतिज्ञा करवून घेण्यात आली. सोबतच इतरांनाही स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेणार असल्याची प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली. यानंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता करून अभियानाला शुभारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी स्वत: गाजर गवत उपटले. सोबत कर्मचाऱ्यांनी गवत काढले. खराट्यांनी स्वच्छता करण्यात आली. गाव पातळीवर ग्रामसभेमध्ये सभासदापासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. शाळांमध्ये स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यवतमाळ शहरातही भल्या पहाटे कर्मचाऱ्यांनी झाडूच्या मदतीने स्वच्छता केली. एनसीसी कार्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी झाडू घेवून स्वच्छता केली. या अभियानाला नागरिकांनीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियानाने जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ झाला. (शहर वार्ताहर)