दोन लाख शेतकरी : कर्जावर दरवेळी दोन टक्के रक्कम कपात
By Admin | Updated: June 19, 2015 02:01 IST2015-06-19T02:01:49+5:302015-06-19T02:01:49+5:30
एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवितो आहे, तर दुसरीकडे याच शेतकऱ्यांचे प्रत्येकी किमान २० हजार रुपये सेवा सहकारी संस्थांकडे पडून आहेत.

दोन लाख शेतकरी : कर्जावर दरवेळी दोन टक्के रक्कम कपात
शेअर्सचे ५० कोटी पडून
यवतमाळ : एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवितो आहे, तर दुसरीकडे याच शेतकऱ्यांचे प्रत्येकी किमान २० हजार रुपये सेवा सहकारी संस्थांकडे पडून आहेत. पीक कर्जावर शेअर्स म्हणून ही रक्कम कपात केली गेली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी जिल्हाभरातील ५९४ सेवा सहकारी सोसायट्या जुळलेल्या आहेत. बँक सोसायट्यांना तर सोसायट्या शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करते. मात्र प्रत्येकच कर्जाच्या वेळी दोन टक्के रक्कम ही शेअर्स म्हणून कपात केली जाते. या शेअर्स कपातीच्या रकमेची मर्यादा २० हजार रुपये एवढी आहे. २० हजारानंतर कपात बंद केली जाते. आजच्या घडीला सोसायट्यांकडे किमान ५० कोटी रुपये या शेअर्स कपातीतून गोळा झाले आहेत.
शेतकरी कर्जासाठी भटकंती करतो आहे. एकीकडे या शेतकऱ्यांचीच हक्काची रक्कम सोसायट्यांकडे पडून आहे तर दुसरीकडे दहा ते वीस हजाराच्या पीक कर्जासाठी हाच शेतकरी बँकेत येरझारा मारताना दिसतो आहे. म्हणूनच सोसायट्यांनी कपात केलेली शेअर्सची दोन टक्के रक्कम या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना परत द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. रक्कम परत देण्याची कायद्यात तरतूद नाही, संस्था नफ्यात असेल तर लाभांष दिला जाऊ शकतो, असे सांगून सोसायट्या हातवर करीत आहेत.
मात्र आमची रक्कम आम्हाला परत द्या, यासाठी शेतकरी आग्रही दिसतो आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी बँकांना धारेवर धरणारे, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि न्याय द्यावा, अशी मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
५९४ सेवा सोसायट्यांचं चांगभलं
सेवा सोसायट्या शेतकऱ्यांकडून शेअर्सची रक्कम दोन टक्क्यांनी कपात करते. तर पुढे या सोसायट्या जिल्हा बँकेतून घेणाऱ्या कर्जापोटी शेअर्स भरतात. एवढेच नव्हे तर जिल्हा बँकेलाही राज्य बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर पाच टक्के शेअर्स भरावे लागत असल्याचे सांगितले जाते. सोसायट्या नव्या सभासदांकडून दहा टक्के तर जुन्या सभासदांकडून पाच टक्के शेअर्स वसुली करते. शेअर्सची ही रक्कम सोसायट्या आपले उत्पन्न म्हणून सांभाळते. या सोसायट्यांना जिल्हा बँकेने अलिकडच्या काळात दोन वेळा लाभांश दिला आहे. मग सोसायट्या लाभांष का देत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज निरंक असेल तर सोसायटी त्याच्या शेअर्सचे त्यावेळचे मूल्यांकन करून तेवढी रक्कम त्याला परत करू शकते. जिल्हा बँकेचेसुद्धा राज्य बँकेकडे ६० ते ७० कोटी रुपये शेअर्सपोटी पडून आहेत.