नव्या जिल्हाधिकाऱ्यांचे दोन दिवस ‘मिटिंग सेशन’
By Admin | Updated: May 25, 2015 02:23 IST2015-05-25T02:23:58+5:302015-05-25T02:23:58+5:30
जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे हातात घेतली. तेव्हापासूनच कामाचा धडाका सुरू केला आहे

नव्या जिल्हाधिकाऱ्यांचे दोन दिवस ‘मिटिंग सेशन’
यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे हातात घेतली. तेव्हापासूनच कामाचा धडाका सुरू केला आहे. स्वागत व सत्कार सोहळ््याची औपचारिकता आटोपताच त्यांनी आपल्या कार्यशैलीची छाप सोडली आहे. अधिनस्थ कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश देऊन प्रशासनाची दिशा काय राहील हे पहिल्याच भेटीत सांगितले. चौथा शनिवार आणि रविवार या सलग सुटीच्या दिवसांचा फायदा घेऊन जिल्हाधिकारी सिंह यांनी ‘मिटिंग सेशन’ आयोजित केले.
जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळ जिल्हा नवीन असून, याचा अभ्यास करण्यात फार वेळ न घालविता अधिनस्थ सर्वच यंत्रणेंचा आढावा घेणे सुरू केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीची सुरूवात ही पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातून झाली. शिवाय खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक सार्वजनिक केल्याने सर्वसामान्यांसाठी जिल्हाधिकारी उपलब्ध राहतील हे त्यांनी दाखवून दिले. थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करता येत असल्याने आपसूकच शासकीय यंत्रणेवर याचा सकारात्मक परिणाम झाला. नियमात बसणारी कामे थांबवून ठेवल्यास आपली खैर नाही हे हेरून अनेकांनी अडवणुकीचे धोरण बाजुला सारले आहे.
गेल्या काही दिवसात महसूल यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाला आलेली मरगळ झटकण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी शनिवारी सकाळी ७.३० वाजतापासून रात्री १०.३० पर्यंत बैठका घेतल्या. यात जिल्हा बँकर्स समिती, नगरपरिषद मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, आत्मा समितीची बैठक घेण्यात आली.
दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० वाजतापासूनच सायंकाळपर्यंत विविध विभागाच्या बैठकी बोलाविल्या. यात शेतकरी आत्महत्या, रोजगार हमी योजना, पुनर्वसन, पाणीटंचाई आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा आढावा अशा बैठका घेण्यात आल्या. अधिनस्थ यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी त्यांच्यात चेतना निर्माण करण्याची गरज आहे.
वेळकाढू कर्मचाऱ्यांना ठिकाणावर आणण्यासाठी वेगळ््या पद्धतीचा अवलंबही केला जाईल अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी दिली होती. त्यानुसारच प्रशासनाला गतिमान करण्याच्या हालचाली सुरू आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांना १ तारखेला वेतन
कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत १ तारखेलाच वेतन देण्यात यावे अशी सूचना जिल्हा कोषागार अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी केली. ३० तारखेला पगारबिल सादर झाल्यास ते शक्य होणार नाही असे कोषागार अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पगार बिल वेळेत सादर करण्याच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील असेही सचिंद्रप्रताप सिंह यांनी सांगितले.