यवतमाळ : गतवर्षी रबी हंगामात झालेल्या गारपिटीने गहू आणि हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता त्यांना मोबदला जाहीर करण्यात आला आहे. तीन हजार ५०० शेतकरी विम्यास पात्र ठरले असून त्यांना दोन कोटी ३३ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात गतवर्षी रबी हंगाम ऐन काढणीला आला असताना गारपीट झाली. यात गहू, हरभरा पिकाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. तत्पूर्वी जिल्ह्यातील तीन हजार ५३३ शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा पिकाचा विमा उतरविला होता. यामध्ये तीन हजार १५२ हेक्टरवरील पीक संरक्षित करण्यात आले होते. त्यापोटी सहा लाख ३९ हजार रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला होता. आता विमा कंपनीने नुकसान भरपाई मंजूर केली आहे. तीन हजार ४२९ शेतकऱ्यांना दोन हजार ९५९ हेक्टरवरील पिकांचा विमा मंजूर करण्यात आला. त्यापोटी दोन कोटी ३३ लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गव्हाचा विमा उतरविणाऱ्या दोन हजार ९२८ शेतकऱ्यांना एक कोटी ८५ लाख तर हरभऱ्याची लागवड करणाऱ्या ५०१ शेतकऱ्यांना १४ लाख ५० हजारांचा विमा मंजूर करण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)
रबी पीक विम्याचे दोन कोटी मंजूर
By admin | Updated: January 10, 2015 23:02 IST