बैलबाजारांना लागली उतरती कळा
By Admin | Updated: July 25, 2015 02:46 IST2015-07-25T02:46:00+5:302015-07-25T02:46:00+5:30
एकेकाळी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील बैलबाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहेत.

बैलबाजारांना लागली उतरती कळा
यवतमाळ : एकेकाळी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील बैलबाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या बैलजोड्या विकणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी खरेदीदारच मिळत नसल्याने हे बाजार ओस पडले आहेत.
वणी, घाटंजी, पांढरकवडा आदी तालुक्याच्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपर्यंत प्रचंड मोठे बैलबाजार भरत असत. त्याठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला हवी तशी बैलजोडी मिळेलच, अशी खात्री वाटायची. तर बैल विक्रीसाठी येणारे कास्तकारही आपल्याला रिकाम्या हाताने परतावे लागणार नाही, याबाबत निश्चिंत असत. मात्र, काही वर्षांपासून या बाजारांतील गर्दीही ओसरली आहे आणि तेथील विक्रीच्या प्रमाणातही घट झाली आहे.
सतत तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढवत आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारे बैलच विकून पेरणी करण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बैलजोडी विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, सारेच शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने बैलजोड्यांना खरेदीदार मिळणे कठीण झाले आहे.
पूर्वी अनेक शेतकरी खरेदीदार मिळत नसल्याचे दिसताच कत्तलखान्यासाठी म्हातारे बैल विकून टाकत होते. मात्र, कत्तलखान्यांसाठी जाणारी जानावरे पकडली जात आहे. त्यामुळे या खरेदीदारांवरही मर्यादा आली आहे. त्याचवेळी बैलजोड्यांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वधारल्या आहेत. तेवढी किमत मोजून बैलजोडी विकत घेण्यापेक्षा शेजारच्या कास्तकाराची बैलजोडी भाडेतत्त्वावर घेण्याची मानसिकता तयार झाली आहे. भाडेतत्त्वावरील बैलजोडी वापरून वेळ मारून न्यायची अन् कसेबसे पीक घ्यायचे, असा प्रकार सध्या सर्वच शिवारात दिसते. त्यामुळे बैलबाजारातील उलाढाल रोडावली आहे. (प्रतिनिधी)