फुलसावंगी ते नांदेडचे प्रवास भाडे चक्क चार लाख !
By Admin | Updated: January 29, 2016 05:09 IST2016-01-29T05:09:24+5:302016-01-29T05:09:24+5:30
चोरट्यांनी फुलसावंगीतून नांदेड रेल्वे स्थानकावर सुखरुप पोहोचवून देणाऱ्या आपल्या साथीदाराला चक्क चार लाख

फुलसावंगी ते नांदेडचे प्रवास भाडे चक्क चार लाख !
महागाव : चोरट्यांनी फुलसावंगीतून नांदेड रेल्वे स्थानकावर सुखरुप पोहोचवून देणाऱ्या आपल्या साथीदाराला चक्क चार लाख रुपये इंडिकाचे प्रवास भाडे दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. चोरीतील पैशाच्या या उधळपट्टीची पोलीस दलात चांगलीच चर्चा आहे.
फुलसावंगी येथील कापसाचे व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्याकडे ८ जानेवारी रोजी २७ लाख रुपये रोख व दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या धाडसी चोरी मागे फुलसावंगीतीलच बाबर खॉ शाहदत खॉ (३०) याच्या टोळीचा हात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. या प्रकरणी पोलिसांनी अयजोद्दीन उर्फ लखू अयसोद्दीन नवाब (२०) याला मुंबईच्या डोंबिवली पूर्व येथील आरेगाव भागातून एका साध्या घरात अटक केली. त्याच्याकडून चार हजार रुपये व मुंबईतील जीमखान्याची पावती जप्त करण्यात आली. तो जीमचा शौकीन असल्याचे सांगितले जाते. न्यायालयाने लखूला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या बयानाने २७ लाखांच्या या चोरीची साखळीच उघड झाली. लखूचा थेट चोरीत सहभाग नव्हता. मात्र आरोपींना आपल्या इंडिकाने सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. या गुन्ह्यात एम.एच.२९-व्ही-८३८२ क्रमांकाची इंडिका वापरली गेली.
घटनेच्या रात्री लखूच्या इंडिकामधून टोळीचा सूत्रधार बाबर नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचला. या प्रवासात त्याने उमरखेडवरून एका साथीदारालाही सोबत घेतले होते. रेल्वे स्थानकावर सोडताच बाबरने चोरीतील २७ लाखांच्या रकमेतून हाती आलेले चार लाख रुपये लखूला प्रवास भाडे म्हणून दिले. लखूने ही रक्कम आपला साथीदार अशरफ खा शाहदत खा याला दिली होती. ती रक्कम त्याने आपल्या शेतातील कुटाराच्या पोत्यात लपवून ठेवली होती. यातील तीन लाख ७७ हजार रुपयांची रक्कम महागाव पोलिसांनी बुधवारी रात्री व्हीडीओ चित्रीकरणात त्या शेतातून जप्त केली.
लखूने या गुन्ह्यात अशरफ खॉ शाहदत खा याचा सहभाग असल्याचे सांगितले. बाबर खॉ आणि सोहेलोद्दीन सफरोद्दीन नवाब हे यातील प्रमुख आरोपी आहे. ते अद्याप फरार आहे. पोलीस त्यांच्या मागावर आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपी अटक झाले असून इंडिका गाडी जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील सर्व आरोपी घटनेपासून एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र ते क्वॉईन बॉक्सचा वापर करीत असल्याने पोलिसांना सुरुवातीला त्यांचे औरंगाबादचे लोकेशन मिळाले होते. मात्र तेथून पथक रिकाम्या हाताने परतले होते. या टोळीचा म्होरक्या बाबर हा मुंबईतच दबा धरुन असावा असा संशय महागावचे ठाणेदार प्रकाश शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, पुसदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रकाश शेळके, दुय्यम ठाणेदार एस.डी. गोसावी, नितीन चरडे, आनंद चंदेवाड, सुनील पंडागळे, युवराज जाधव आदींनी ही कामगिरी केली. (शहर प्रतिनिधी)