पोफाळी तलावाचा कायापालट
By Admin | Updated: May 16, 2016 02:41 IST2016-05-16T02:41:31+5:302016-05-16T02:41:31+5:30
तालुक्यातील पोफाळी येथील तलावाचा कायापालट करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी कंबर कसली असून यात महिलांचेही मोठे योगदान आहे.

पोफाळी तलावाचा कायापालट
दोन लाख लोकवर्गणी : २०० ट्रॅक्टर गाळ काढला
उमरखेड : तालुक्यातील पोफाळी येथील तलावाचा कायापालट करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी कंबर कसली असून यात महिलांचेही मोठे योगदान आहे. तलावाचा कायापालट करण्यासाठी दोन लाख रुपये लोकवर्गणी गोळा झाली असून आतापर्यंत २०० ट्रॅक्टर गाळ उपसण्यात आला आहे.
गत १५ दिवसांपासून पोफाळी, जनुना आणि वसंतनगर येथील नागरिकांनी एकत्र येऊन पोफाळी तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. त्याला गावकऱ्यांनी सहमती देताच लोकवर्गणीला प्रारंभ झाला. पाहता पाहता दोन लाख रुपये लोकवर्गणी गोळा झाली. दोन जेसीबीच्या मदतीने पोफाळी तलावातील गाळ उपसला जात आहे. आतापर्यंत २०० ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला आहे. आपसातील सर्व मतभेद बाजूला ठेवून दररोज सकाळी आजूबाजूच्या गावातील नागरिक पोफाळी तलावावर श्रमदानासाठी येत आहे. यात महिलांचाही मोठा सहभाग आहे.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती विमलताई चव्हाण, पोफाळी ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, खुशी ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, जनुनाच्या सरपंच रंजना घोंगडे, सावित्री राठोड, रेखाताई कोटूरकर, ज्योती भोजनकर, ताई देडगे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी सतीश नाईक, अॅड. युवराज देवसरकर, अॅड. निरंजन पाईकराव, अॅड. सिद्धार्थ घोंगडे, निरंजन चव्हाण, मनोज जयस्वाल, संजय देशमुख, डॉ. अमोल पुरी, अवधूत देशमुख, शिवाजी कनवाळे, प्रभाकर ठाकरे, सुधाकर जाधव, माधव गुठारे आदींनी पुढाकार घेतला आहे. या तलावातील गाळ काढल्यानंतर आगामी काळात पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. (शहर प्रतिनिधी)