पैनगंगेतून रेती तस्करी
By Admin | Updated: March 27, 2015 01:43 IST2015-03-27T01:43:15+5:302015-03-27T01:43:15+5:30
तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेती उत्खनन जोरात सुरू आहे. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला लाखो रुपयांचा चूना लागत आहे.

पैनगंगेतून रेती तस्करी
उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेती उत्खनन जोरात सुरू आहे. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला लाखो रुपयांचा चूना लागत आहे.
चातारी, बोरी, देवसरी, साखरा, लोहरा, बिटरगाव, सावळेश्वर, तिवरंग, दिवट पिंपरी, हातला आदी ठिकाणांवरून अवैधरित्या नियमबाह्य पद्धतीने रेती उत्खनन सुरू आहे. काही रेती घाटांचा लिलाव झालेला नाही. मात्र हा सर्व प्रकार तहसीलदारांना माहीत असतानाही याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या परिसरातून रेती वाहतूक करणारी वाहने शेतीचे अतोनात नुकसान करीत आहे. अनेकांच्या शेतातून कालव्याचे मॅनर गेले असल्यामुळे या वाहनांच्या वाहतुकीमुळे मॅनरचीही तुटफूट होत आहे. यातूनही शासनाला नुकसान होत आहे.
लाखो रुपये खर्च करून शासनाने इसापूर धरणाचा कालवा निर्माण केला. शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटण्यासाठी शासन विविध मार्ग अवलंबित आहे. मात्र येथील तहसील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे अवैध रेती उत्खनन करणारे खुलेआम रेतीची वाहतूक करीत आहे. शासन रेती माफियांविरुद्ध कठोर पावले उचलत असले तरी त्यातूनही रितसर जडतोड करून येथील महसूल कर्मचारी पळवाटा काढत आहे. काही वाहनांना थातूरमातूर दंड ठोठावून कारवाई केल्याचे दाखविले जाते.
शासनाने सुधारित प्रणालीचा वापर करून ज्या पद्धतीने कारवाईच्या अंमलबजावणीचा प्रयत्न सुरू केला असला तरीदेखील रेती चोर काही प्रणालींच्या विरोधात जावून आर्थिक साटेलोटे करून नदी पात्रातील रेती तेवढ्याच प्रमाणात चोरी करीत आहे. महसूल विभागाने काही अंश सुधार पद्धतीचा आव आणून चोरट्या उत्खननाला आळा बसला असल्याचे सांगितले असले तरी त्यामध्ये फारसे तथ्य नाही. रेती तस्कर आपले काम या ना त्या मार्गाने करीतच आहे. अवैध रेती उत्खननावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सक्षम पथक निर्माण करावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
(शहर प्रतिनिधी)