पांढरकवडा येथे वाहतूक व्यवस्थेचे वाजले तीनतेरा

By Admin | Updated: August 13, 2015 03:16 IST2015-08-13T03:16:20+5:302015-08-13T03:16:20+5:30

शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून त्याचे तीनतेरा वाजले आहे.

The traffic arrangement at Pandharkawada was about three o'clock | पांढरकवडा येथे वाहतूक व्यवस्थेचे वाजले तीनतेरा

पांढरकवडा येथे वाहतूक व्यवस्थेचे वाजले तीनतेरा


पांढरकवडा : शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून त्याचे तीनतेरा वाजले आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज कुठे ना कुठे, लहान-मोठे अपघात घडत आहे़ याबाबत अनेकदा पोलीस, नगरपरिषदेकडे तक्रारी करूनही या गंभीर बाबीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही़ त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे़
शहरातील राम मंदिर ते आखाडा रोड, चालबर्डी रोड आदी मार्गावर बहुतांश शाळा, महाविद्यालये आहेत. या मार्गावर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी वाहने दिवसभर उभी असतात. त्यामुळे वाहतूक प्रभावीत होत आहे. शहरात जागोजागी मोकाट जनावरेसुद्धा तळ ठोकून बसतात. पूर्वी मोकाट जनावरे कोंडवाड्यात टाकल्यानंतर त्यांचा लिलाव खासगी व्यक्तीला दिला जात होता. त्यामुळे मोकाट जनावरांची समस्या बऱ्याच प्रमाणात सुटली होती. तथापि गेल्या काही दिवसात शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोकाट जनावरांचे कळपच्या कळप दिसत आहे. त्यामुळेही वाहतूक समस्येत वाढ झाली आहे.
शहरात वराहांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जागोजागी वराहांचे कळप रस्त्यांवरून फिरताना दिसतात़ सरळ घरातही घुसायला हे वराह मागे पुढे पाहत नाही. ते कधी-कधी सरळ घरातसुद्धा घुसतात़ त्यामुळे नागरिक वैतागले आहेत़ या वराहांच्या भर रस्त्यावरील भ्रमंतीमुळे वाहतुकही प्रभावीत होत असून त्यामुळे अपघात घडत आहे़ मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आखाडा मार्गावरील स्टेट बँकेजवळ वराहाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक खाली पडून त्याच्या डोक्याला मार लागनूत तो जखमी झाला़
शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सुसाट वेगाने दुचाकी वाहने चालविण्याचे प्रमाणही वाढले आहे. भरधाव वाहने चालविणाऱ्या या मुलांना पालकांचा व इतर कुणाचाही धाक राहिला नसल्याचे निदर्शनास येत आहे. चालक परवाना मिळविण्याचे वय नसल्याने ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांजवळ वाहन चालविण्याचा परवानाच नाही. तथापि त्याची साधी चौकशी केली जात नाही. एका दुचाकीवर तिघे-तिघे, चौघे-चौघे बसून वेगाने वाहने चालविणाऱ्या या विद्यार्थ्यांवर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालयाच्या वेळात हे नवखे वाहन चालक सुसाट वेगाने वाहने चालवितात. या अनिर्बंध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. नेहमीच विस्कळीत होणारी वाहतूक ही शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. येथील बसवेश्वर चौक, तहसील चौक, मेन चौक, बसस्थानक चौक, जैन चौक, ओम टॉकिज रोड, वाय पॉइंट चौक, बिरसा मुंडा चौक, डायमंड चौक, आठवडी बाजार रोड, स्टेट बँक चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. याबाबत शहरवासीयांनी अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. मात्र ही समस्या अद्यापही कायमच आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The traffic arrangement at Pandharkawada was about three o'clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.