परंपरागत शेतीत बदल आवश्यक
By Admin | Updated: August 30, 2015 02:15 IST2015-08-30T02:15:24+5:302015-08-30T02:15:24+5:30
शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने जीवन जगणे शिकले पाहिजे. आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. बदलत्या वातावरणात आता शेती पिकात बदल करणे गरजेचे आहे,....

परंपरागत शेतीत बदल आवश्यक
राजीव शेट्टी : अंबोडा येथे शेतकरी मेळावा, शेताची प्रत्यक्ष पाहणी
महागाव : शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने जीवन जगणे शिकले पाहिजे. आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. बदलत्या वातावरणात आता शेती पिकात बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजीव शेट्टी यांनी केले.
अंबोडा येथील गजानन महाराज संस्थानच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘अमृत पॅर्टन’ पुस्तकाचे प्रकाशन खासदार शेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर प्रामुख्याने उपस्थित होते.
खासदार शेट्टी पुढे म्हणाले, पुर्वी शेतीसाठी आर्थिक उलाढालीचे केंद्र हे त्या-त्या गावच्या सोसायट्या होते. जिल्हा मध्यवर्ती बँका त्यासाठी कर्ज पुरवठा करीत होत्या. शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीची बलस्थाने पांढरपेशांनी घेरली. शेतकऱ्यांच्या बँका असलेल्या संस्थेत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला. शेतकऱ्यांना सावकार आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या दारात जावे लागत आहे. कधी बँका तर कधी सावकार शेतकऱ्यांची पिळवणूक करू लागले. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रकार वाढीस लागले. शासनाला शेतकरी आत्महत्येचे मुळ शोधण्यास बाध्य करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या संघटनांनी एकत्र लढा उभारण्याची गरज शेट्टी यांनी व्यक्त केली.
वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यावेळी समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. पंडित चव्हाण, जगदीश नरवाडे, मनीष जाधव, प्रकाश कोपरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी नागोराव कदम, प्रकाश इंगोले, अमृतराव देशमुख, डॉ. संदीप शिंदे, हनवंतराव देशमुख, दादाराव ठाकरे, अविनाश पतंगराव, एम.डी. मिराशे, शंकरराव राजेगोरे, हरिभाऊ कुंडेकर, गुलाब शेतीच्या महिला शेतकरी लक्ष्मीबाई पारवेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
(शहर प्रतिनिधी)