दहावीच्या परीक्षेतील सेंच्युरीमागे आरोहीचा कुल मार्इंडेड अभ्यास

By Admin | Updated: June 16, 2017 01:39 IST2017-06-16T01:39:50+5:302017-06-16T01:39:50+5:30

दहावीची परीक्षा देणारा विद्यार्थी ज्या घरात असतो, तिथले वातावरण प्रचंड टेन्स असते. रात्री उशिरापर्यंत जागरण... पहाटे उठूनही अभ्यासच...

Total Minded Study of Ascent of Class X in Century | दहावीच्या परीक्षेतील सेंच्युरीमागे आरोहीचा कुल मार्इंडेड अभ्यास

दहावीच्या परीक्षेतील सेंच्युरीमागे आरोहीचा कुल मार्इंडेड अभ्यास

यशोगाथा : अभ्यासाचा ताण नव्हे भान ठेवले
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावीची परीक्षा देणारा विद्यार्थी ज्या घरात असतो, तिथले वातावरण प्रचंड टेन्स असते. रात्री उशिरापर्यंत जागरण... पहाटे उठूनही अभ्यासच... उजव्या हाताने जेवताना डाव्या हाती पुस्तक... मग दिवसभर शाळा, शिकवणी... पुन्हा डोळा लागत नाही तोवर डोळ्यापुढे पुस्तक... पोरांना श्वास घ्यायलाही फुरसत नसते. पण असे काहीच न करताही यवतमाळच्या आरोही अनिल अमीन या विद्यार्थिनीने दहावीत शंभर टक्के गुण मिळविले. हे कसे शक्य झाले? आरोही म्हणाली, ‘नववी काय अन् दहावी काय? सारखेच! टेन्शन घेण्यापेक्षा कूल राहायचे. अभ्यास करीत राहायचे. बस्स!’
मेरीटचा विद्यार्थी म्हणजे, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, चेहऱ्यावर गंभीर भाव, हसण्यावर जणू बंदीच. हे चित्र शंभर टक्के मिळविणाऱ्या आरोहीच्या घरी अजिबातच नाही. दिलखुलास हास्य आणि विनम्रतेने आरोहीने आपल्या यशाविषयी ‘लोकमत’शी गप्पा मारल्या. पण तिचे शब्द सामान्य असले तरी यश असामान्य आहे आणि पुढची स्वप्ने तर त्याहूनही उत्तुंग..!
सतत अभ्यासाची गरज नाही
आरोही म्हणाली, खूप दिवस-दिवसभर नुसता अभ्यासच करत बसले पाहिजे असे काही नाही. मी तर दिवसातून केवळ २-३ तास अभ्यास केला. पण जेवढा केला तो पूर्ण मन लावून केला. घरी आल्यावर शाळेत जे शिकवले ते सर्वात आधी वाचले. जो लेसन झाला, तो पुन्हा दोन तीन वेळा वाचला. सखोल समजून घेतला. या पद्धतीने संपूर्ण वर्षभर अभ्यास केला म्हणून परीक्षेच्या दिवसातही अजिबात टेन्शन आले नाही. रोज सकाळी थोडावेळ आणि रात्री थोडावेळ असा अभ्यास केला. अगदी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही अभ्यासाची वेळ बदलली नाही. पण सणही साजरा केला.
सरावावर यश अवलंबून
कूल माइंडेड अभ्यासाने गुणांची शंभरी ठोकणारी आरोही अनिल अमीन म्हणाली, अमूक शाळेतले विद्यार्थी हुशार आणि तमूक शाळा बेकार असे काहीच नसते. सर्वच शाळेत सर्वच शिक्षक एकच अभ्यासक्रम शिकवत असतात. सरांनी जे शिकवलं त्याकडे विद्यार्थी कसे बघतात, ते किती समजून घेतात, त्यावर किती सराव करतात, हेच महत्त्वाचे असते. मला स्वत:ला जॉमेट्री जरा अवघड वाटायचे. मग त्यावर फोकस केला. प्रत्येक प्रॉब्लेम समजून सोडवून घेतला. हॉट्स क्वेश्चनचा भरपूर सराव केला. शिकवणी वर्ग लावणे चांगलेच आहे. शिकवणीमुळे अभ्यासाची रिव्हीजन चांगली होती. शाळेत जाताना खंड पडला, तर तो अभ्यास शिकवणीत भरून निघतो.

स्वत: केलेल्या सरावावर आरोहीने गाठली शंभरी
जिल्ह्यातील टॉपर : शिकवणी लावली, टेस्ट सिरीज नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुणांसह जिल्ह्यात टॉपर ठरलेली जायन्टस् इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आरोही अमीन हिने केवळ स्वत: केलेल्या सरावाच्या बळावर गुणांची शंभरी गाठली आहे.
‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत आरोही म्हणाली, मी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संस्कृतची शिकवणी लावली. पण टेस्ट सिरिज लावल्या नाही, स्वत: केलेला सराव उपयोगी ठरला. गाईड्स तर रेफर केल्याच पण शाळेतले प्रत्येक पुस्तक पूर्ण वाचले.
आरोहीला स्पेस सायंटिस्ट व्हायचंय
दहावीत शंभर टक्के मिळवणारी आरोही पहिलीच विद्यार्थिनी. पुढच्या आयुष्यात तिला स्पेस सायंटिस्ट व्हायचे आहे. त्या सुविधा आपल्या परिसरात मिळणार नाही, याची तिला जाणीव आहे. म्हणून ती म्हणते, मी डॉक्टर होणार. स्वप्न व वास्तवातला फरक ओळखणाऱ्या आरोहीने कोणत्याच वर्गात पहिला नंबर सोडला नाही, असे तिचे वडील अनिल सांगतात. आरोहीने काय बनावे हा तिचा प्रश्न आहे, आमच्या तिच्याकडून कोणत्याच अपेक्षा नाही, ती जे करेल ते उत्तमच करेल, असा विश्वास तिची आई योगीता अमीन व्यक्त करतात.

गाणे, नृत्य, चित्रकला मोलाची
अभ्यासाच्या गडबडीत विद्यार्थी छंद बाजूला ठेवतात. किंबहुना आईवडीलही त्यांना तसे करायला लावतात. पण आरोहीला शंभर टक्के गुण मिळाले ते छंदामुळेच. ५०० पैकी तिला ४९० गुण मिळाले. मात्र गाण्याची, नृत्याची आणि चित्रकलेची आवड तिच्यासाठी दहा गुणांची भेट ठरली. अन् तिचे गुण झाले ५०० पैकी ५००! आरोहीने गायनाच्या ४ परीक्षा दिल्या आहेत. चित्रकलेत इंटरमिजियेट परीक्षा दिली आहे. यासोबतच सातवीत तिला शिष्यवृत्ती मिळाली. डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेतही तिची निवड झाली. एकंदरीतच ती बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची धनी आहे.
अंगणात रांगोळी, घरकामात अग्रेसर
दहावीत मेरीट आलेली आरोही अमीन पहिलीपासूनच वर्गात नंबर वन राहिली आहे. पण नुसता अभ्यास हा तिचा स्वभाव नाही. आईला सर्व घरकामात तिची भरपूर मदत आहे. दररोज अंगणात रांगोळी काढणे हा तिचा छंद आहे. परीक्षेच्या दिवसातही तो चुकला नाही.

घरात टीव्ही बंद, मोबाईल परीक्षेनंतरच!
दहावीत असतानाही आरोहीने डिसेंबर महिन्यापर्यंत रोज दोन तास टीव्ही पाहिला. पण डिसेंबरपासून तिने ठरविले आता टीव्ही बंद. मग मुलीच्या निर्धारासाठी आईबाबा आणि बहीण-भावानेही त्याग केला. आरोहीची परीक्षा संपेपर्यंत अमीन कुटुंबीयांनी टीव्ही आॅन केलाच नाही. मोबाईलपासूनही आरोही दूर राहिली. परीक्षा संपल्यावरच तिने मोबाईल हाती घेतला. त्याग आणि ‘डिव्होशन’मुळेच हे यश मिळाल्याचे तिचे मत आहे.

Web Title: Total Minded Study of Ascent of Class X in Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.