‘वसंत’च्या उमरखेड गटातील तीन जागांसाठी आज मतदान
By Admin | Updated: April 24, 2016 02:39 IST2016-04-24T02:39:19+5:302016-04-24T02:39:19+5:30
वसंत सहकारी साखर कारखान्याची १९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न केले.

‘वसंत’च्या उमरखेड गटातील तीन जागांसाठी आज मतदान
१६ जागा अविरोध : नेत्यांच्या विरोधात पुकारला ‘एल्गार’
उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याची १९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. त्यात १६ जागा अविरोध करण्यात यश आले. परंतु उमरखेड गटातील तीन जागांसाठी चार उमेदवार उभे राहिल्याने २४ एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे.
वसंत सहकारी साखर कारखाना येथील निवडणूक लागली आहे. त्यात सहकार क्षेत्रातील सर्वच नेत्यांनी आपापली ताकद दाखवित उमेदवार अर्ज भरले. २४६ उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुकीत चुरस वाढली. परंतु वसंत कारखान्याची आर्थिक स्थिती अतिशय डबघाईस आली असल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक अविरोध करण्यासाठी सहमती दर्शविली. त्यात वसंतराव नाईक शेतकरी पॅनल तयार करण्यात आले आणि १९ जागांसाठी उमेदवारी दिली. इतर सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे इतर सर्वच उमेदवारांनी अर्ज परत घेतले. परंतु उमरखेड गटातील तीन जागांसाठी चार उमेदवारी अर्ज राहिले.
डॉ.अनिल कनवाळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे पाच तालुक्यातून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नाईक पॅनलचे चितांगराव कदम, नानाराव चव्हाण, विलास मोरे हे तिघे आपले नशीब आजमावत असून या तिघांच्या विरोधात अनिल कनवाळे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.
सर्वपक्षीय नेत्यांच्या विरोधात एल्गार पुकारून त्यांनी उमेदवारी कायम ठेवली, अशी प्रतिक्रिया मतदारांमध्ये उमटत आहे. केवळ एका उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया करावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)