पाण्यासाठी घर सोडण्याची वेळ
By Admin | Updated: May 11, 2014 00:40 IST2014-05-11T00:40:06+5:302014-05-11T00:40:06+5:30
यवतमाळ शहरात सर्वच परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई आढळून येते. या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी विविध क्लृप्त्या लढविणे सुरू केले आहे.

पाण्यासाठी घर सोडण्याची वेळ
यवतमाळ शहरात सर्वच परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई आढळून येते. या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी विविध क्लृप्त्या लढविणे सुरू केले आहे. अनेक नागरिकांनी पाण्यासाठी स्वत:ची घरे सोडून ज्या नातेवाईकांकडे भरपूर पाणी आहे, अशा नातेवाईकांच्या गावाला जाणे पसंंत केले आहे. प्रभाग क्र. २ मधील सुनंदा मेंढे, सविता गेडाम या महिलांंनी आम्ही सुद्धा येथे पाणीच मिळत नसल्याने गावाला जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. यवतमाळ नगर परिषदेच्या प्रभाग क्र. २ मध्ये तलावफैल, गवळीपुरा, विटभट्टी, अंबिकानगर, सुराणा लेआऊट, अशोकनगर, आंबेडकरनगर, राजारामनगर, दलित वस्ती सोसायटी आदी परिसर येतो. या संपूर्ण परिसरात फिरून प्रत्यक्ष नागरिकांशी संपर्क साधून पाणीटंचाई संदर्भात त्यांना विचारणा केली असता अतिशय गंभीर परिस्थिती दिसून आली. अधिकृत नळग्राहक वंचित ज्या नागरिकांनी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे रितसर अर्ज करून नळ जोडणी घेतली आहे, त्यासाठी त्यांनी जवळपास १५ हजार रुपये खर्च केला आहे. अशा लोकांना पाणी मिळत नसताना काही लोकांनी अनधिकृतपणे प्राधिकरणाच्या मुख्य वाहिनीवरून नळ जोडणी घेतली आह, त्यांना मात्र भरपूर पाणी मिळते. अशा लोकांकडे पाण्याचे मीटरच नसल्यामुळे त्यांना बिलसुद्धा भरावे लागत नाही. त्यामुळे अधिकृत नळ जोडणी घेतलेल्या नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असल्याचे राजाराम नगरात दिसून आले. घरगुती नळांना केले खड्डे पाण्याचा दाब कमी झाल्याने ते जमिनीच्या एक फूट वरही चढत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना जमिनीखाली तीन ते चार फूटचे खड्डे केले आहेत. या खड्ड्यात उतरून पाणी भरले जाते. परंतु महिनाभरापासून नळाला पाणीच न आल्यामुळे या खड्ड्यांचाही कोणताही उपयोग होत आहे. सायकल व रिक्षांचा वापर पाण्याचे घराजवळील सर्व स्रोत बंद असल्यामुळे नागरिकांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. इतक्या दुरवरून डोक्यावर पाणी आणणे शक्य नसते. त्यामुळे अनेक जण सायकल, रिक्षा अथवा इतर वाहनांचा पाणी आणण्यासाठी उपयोग करतात. त्यासाठी रिक्षाचे भाडेही नागरिकांना मोजावे लागते. महिनाभरापासून पाणीच नसल्यामुळे ज्यांच्याकडे पाणी आहे, अशा लोकांकडून एक ते दोन रुपये गुंडाप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. या परिसरात असलेले नगर परिषदेचे बोअरवेल बंद पडले आहेत. हातपंप नाही त्यामुळे फुकटनगरातील हातपंपावरून पाणी आणावे लागत असल्याची माहिती ज्योती बनसोड या महिलेने दिली. प्रशासनाचे दावे फोल नगरपरिषदेकडून दररोज प्रत्येक वॉर्डात टँकर पाठविण्यात येत असल्याचे दावे करण्यात येत आहे. वास्तविकता मात्र वेगळी आहे. टँकर पोहोचतच नाही. त्यामुळे हे टँकर नेमके जातात कोठे, याचा शोध पालिका प्रशासनानेच घ्यावा, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली. काही भागात पहिल्यांदाच टँकर पोहोचल्याचे नागरिकांनी सांगितले. या टँकरचे पाणी पाच-सहा कुटुंबीयांनाच मिळू शकले. पाटीपुरा परिसरात खड्डा खोदून पाणी भरावे लागत आहे.