जिल्हा परिषदेत नावडती सोबत नांदण्याची वेळ
By Admin | Updated: August 29, 2014 00:08 IST2014-08-29T00:08:34+5:302014-08-29T00:08:34+5:30
विधानसभा निवडणूक आचार संहितेतच जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. राज्यात आघाडी करून विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रसने

जिल्हा परिषदेत नावडती सोबत नांदण्याची वेळ
सुरेंद्र राऊत - यवतमाळ
विधानसभा निवडणूक आचार संहितेतच जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. राज्यात आघाडी करून विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रसने यवतमाळ जिल्हा परिषदेत मात्र आतापर्यंत एकमेंकांची जिरविण्याचाच प्रयत्न केला. संभाव्य निवडणुका लक्षात घेता आता या दोन्ही पक्षांपुढे एकत्र बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. स्थानिक नेते मंडळी आपल्या मतदारसंघात पूरक ठरले अशीच खेळी करण्याच्या मानसिकतेत आहे.
जिल्हापरिषदेत सर्वाधिक संख्याबळ हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसजवळ आहे. मात्र स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षात विस्तव आडवा जात नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसला शह देण्यासाठी ही खेळी करण्यात आली. काँग्रेसनेही जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पुरेपूर कोंडी केली. जिल्हा नियोजन समितीतील निधीच काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी अडवून धरला. त्यामुळे सत्ता येऊनही फारसा उपयोग राष्ट्रवादी व शिवसेनेला झाला नाही. शिवसेनेने अर्ध्यावरच राष्ट्रवादीसोबतचा आपला संसार मोडीत काढला. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष गेल्या काही दिवसांपासून अल्पमतात काम करीत आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहे.
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जिल्हा परिषदेतील गुंता सोडवावा लागणार आहे. २१ सप्टेबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक आहे. आणि त्यापूर्वी १४ सप्टेबर रोजी पंचायत समिती सभापतींची निवड प्रक्रिया आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडींचे दुरगामी परिणाम आजपर्यंत विधानसभेत उमटले आहे. ३० हजार मतदारांतून निवडून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य चांगल्या आमदाराचेही गणीत बिघडवू शकतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळेच आता नेते मंडळी अडचणीत सापडली आहे.
जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा गुंता सोडविताना स्वत:चा फायदा कसा होईल, हाच प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होणार आहे. ‘तुझे नी माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संख्याबळात फार कमी तफावत असल्याने अध्यक्षपदासाठी कोण दावेदारी करतो हेही महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसच्या वाट्याला अध्यक्षपद आल्यास जिल्हा परिषदेचा लाल दिवा बाभूळगाव तालुक्यात जाण्याची दाट शक्यता आहे.
सावर, पहुर अथवा फाळेगाव घारफळ या सर्कलमधील सदस्यांना संधी मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला अध्यक्षपद आल्यास डॉ. आरती हरीभाऊ फुफाटे यांचे नाव प्रथम क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. संभाव्य विधानसभेसाठी जातीय समीकरणातून आपला विजय निश्चित करण्याकडे कल राहणार आहे. पुसद विधानसभेत आंध समाज हा मोठ्या प्रमाणात असून, त्यांची निर्णायक भुमिका राहली आहे.हिच मते मिळविण्यासाठी डॉ. आरती फुपाटे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. उपाध्यक्षपद द्यावयाचे झाल्यास महागाव तालुक्यातील परसराम गंगाराम डवरे यांचाही विचार केला जाऊ शकतो.
अजूनतरी नेते मंडळी विधानसभा तिकीटाच्या धामधुमीतच व्यस्त आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार की नाही, शिवसेना-भाजप युतीचेही भवितव्य काय राहणार हे अजून निश्चित नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व विषय समित्यां निवडीची बाब फारसी गांभिर्याने घेतलेली नाही. परंतु पक्षातील इच्छुकांनी आपल्या स्तरावरून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महिला आरक्षण असल्याने अध्यक्षपदा व्यतिरिक्त इतर पदासाठीच चढाओढ होण्याची
चिन्हे आहेत.