काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचा एक नवा चेहरा
By Admin | Updated: July 22, 2015 00:25 IST2015-07-22T00:25:39+5:302015-07-22T00:25:39+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण गटासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून होत असलेल्या फेर निवडणुकीत काँग्रेसने तीनही तर राष्ट्रवादीने एक नवा चेहरा देण्याचे निश्चित केले आहे.

काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचा एक नवा चेहरा
यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण गटासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून होत असलेल्या फेर निवडणुकीत काँग्रेसने तीनही तर राष्ट्रवादीने एक नवा चेहरा देण्याचे निश्चित केले आहे. आठ जागांसाठी ही निवडणूक होत असून त्याकरिता १२ सदस्यांनी नामांकन दाखल केले आहे. जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य या निवडणुकीत मतदाराची भूमिका बजावणार आहेत. नामांकन मागे घेण्याची ३ आॅगस्ट ही अंतिम तारीख आहे.
जिल्हा परिषद सदस्य मिलींद धुर्वे यांच्या याचिकेवरून ही निवडणूक होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जुळवून घेत प्रत्येक तीन सदस्य वाटून घेतले आहे. शिवसेने चार उमेदवार रिंगणात उतरले आहे. भाजपचा एक उमेदवार आहे. या शिवाय अपक्ष असलेल्या मिलिंद धुर्वे यांनी मनसे सदस्य अल्का टेकाम यांच्या मदतीने नामांकन दाखल केले आहे. नियोजन समितीसाठी राष्ट्रवादीकडून केवळ एक उमेदवार बदलविण्यात आला आहे. पुर्वी असलेल्या ययाती नाईक यांच्याऐवजी प्रवीण देशमुख यांनी नामांकन दाखल केले आहे. उर्वरित राकेश नेमनवार आणि अमोल राठोड या सदस्यांचे अर्ज आहेत. काँग्रेसने मात्र तिन्ही उमेदवार बदलविले असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यांचे समर्थक सीमा देशभ्रतार, आर्णी तालुक्यातील सोनबा मंगाम आणि प्रकाश कासवार यांनी नामाकंन दाखल केले आहे. पूर्वीचे नरेंद्र ठाकरे, वसंत चंद्रे, योगेश पारवेकर यांची गच्छंती करण्यात आली आहे. शिवसेनकडून पूर्वीचे आशिष खुलसंगे, दिवाकर राठोड यांच्यासोबतच सुलोचना भोयर, प्रवीण शिंदे यांनी सुध्दा नामांकन दाखल केले आहे. भाजपनेही उषा राठोड यांचे नामांकन दाखल केले आहे. शिवसेनकडून वेळेवर उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. उर्वरित सदस्य रिंगणात कायम मानले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अटळ आहे.
जिल्हा परिषदेतील ६२ सदस्यांना आठ उमेदवार निवडायचे आहेत. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जुळून घेतल्याने शिवसेनेचा काय पवित्रा राहतो हे महत्वाचे ठरणार आहे. असे असले तरी या तिन्ही पक्षांना भाजप आणि अपक्षांना अॅडजेस केल्याशिवाय निवडणूक टाळता येणार नाही. हा पेच आता राजकीय पटलवार कसा सोडविण्यात येतो यावरच या निवडणुकीचे भवितव्य आहे. अपक्ष उमेदवार मिलींद धुर्वे यांच्यामुळेच ही निवडणूक लागली ते माघार घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. तरी ३ आॅगस्टपर्यंत काय हालचाली होता हे महत्वपूर्ण राहणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)