जड वाहतुकीने जीव धोक्यात
By Admin | Updated: July 26, 2015 02:26 IST2015-07-26T02:26:08+5:302015-07-26T02:26:08+5:30
शहरात वाहतुकीचे तीन-तेरा वाजले असून वाढत्या अतिक्रमणाने मोठे रस्तेही गल्लीचे रुप घेत आहेत.

जड वाहतुकीने जीव धोक्यात
नागरिक त्रस्त : वाहतूक पोलीस शहराबाहेर वसुलीत व्यस्त
पुसद : शहरात वाहतुकीचे तीन-तेरा वाजले असून वाढत्या अतिक्रमणाने मोठे रस्तेही गल्लीचे रुप घेत आहेत. त्यातच शहरातून जड वाहतूक बेलगाम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागते. शहरात मागील काही दिवसात अपघातांमध्ये वाढ झाली असून वाहतूक पोलीस मात्र शहरात दिसतच नाही.
शहरातील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या बसस्थानकासमोरील रस्त्यावर जडवाहनांची अहोरात्र वर्दळ असते. या मार्गानेच शहरातील बहुतेक महाविद्यालयातील विद्यार्थी ये-जा करीत असतात. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून या रस्त्याने जड वाहने नेले जातात. या जड वाहनांना कोणत्याच प्रकारे निर्बंध लावले जात नाही. त्यामुळे या मार्गावर नागरिक व विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना नेहमीच करावा लागतो. या रस्त्याच्या कडेला दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्याच प्रमाणे पाण्याच्या टाकीजवळ, बीएसएनएल आॅफीसकडे जाणाऱ्या मार्गावर छोटे-मोठे टॅक्सी तसेच आॅटोरिक्षा लावलेली असतात. काळी-पिवळ्या गाड्या तर सर्रास रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जातात. परिणामी नागरिकांना आपले वाहन काढताना कमालीची कसरत करावी लागते. या रस्त्यावर काळी-पिवळी, आॅटारिक्षा चालक आपले हक्क दाखवीत वाटेल तिथे आपली वाहने उभी करीत आहेत. बसस्थानकात बस वळविताना चालकाला या वाहनांचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावरील वाहतूक फक्त रस्ता सुरक्षा अभियान सुरू असतानाच सुरळीत करण्यात येते. मात्र त्यानंतरचा पूर्णकाळ या वाहन चालकांसाठी मोकळा असतो.
वाहन चालकांना वाहतुकीचे नियम कळावे यासाठी वाहतूक विभागाकडून नियमांचे सूचनांचे फलक लावणे आवश्यक आहे. मात्र ते कुठेही दिसत नाही. परिणाम वाहतुकीचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)