परजिल्ह्यात अडकलेल्यांचे वणीत आगमन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:42+5:30
पुण्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, खबरदारी म्हणून वणी-यवतमाळ मार्गावरील परसोडा येथे उघडण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य तपासणी केली जात आहे. ज्यांच्या आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत, अशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना पुढील १४ दिवस घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

परजिल्ह्यात अडकलेल्यांचे वणीत आगमन सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : राज्यातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांचे ७ मेपासून वणी शहरात आगमन सुरू झाले आहे. गेल्या आठ दिवसात गुरूवारपर्यंत ३४१ जण वणीत पोहोचले असून त्यात बहुतांश लोक हे कोरोनाचा उद्रेक असलेल्या पुण्यातून आले आहेत. त्यामुळे वणी शहराची काळजी वाढली आहे.
पुण्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, खबरदारी म्हणून वणी-यवतमाळ मार्गावरील परसोडा येथे उघडण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य तपासणी केली जात आहे. ज्यांच्या आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत, अशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना पुढील १४ दिवस घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अखेरपर्यंत बाहेरून येणाऱ्यांची संख्या दीड हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या सर्वांनाच होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यातच आता ही संख्या लक्षात घेता, या सर्वांवर ‘वॉच’ ठेवण्याची मोठी जबाबदारी प्रशासनावर येऊन ठेपली आहे.
सुदैवाने आतापर्यंत परजिल्ह्यातून वणीत आलेल्या कुणातही आजाराची लक्षणे आढळली नाहीत. विशेष म्हणजे आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर निघण्यापूर्वी या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना फिटनेस सर्टीफिकेट त्या-त्या ठिकाणाहून देण्यात आले आहे. मात्र कोरोनाची लक्षणे अनेक दिवसानंतर दिसून येत असल्याने या सर्वांना होम क्वारंटाईन सक्तीचे करणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अनेकजण लॉकडाऊनपूर्वी वणीत परतले होते. अनेकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्केदेखिल होते. मात्र त्यातील अनेकजण मुक्तपणे बाहेर फिरत होते. अशाच एकावर वणी पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला होता.
प्रशासनापुढे निर्माण झाल्या अनेक अडचणी
लॉकडाऊनमुळे शेकडो लोक परजिल्ह्यात अडकून होते. परंतु अलिकडेच त्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार अडकून पडलेले हे लोक हळूहळू वणी शहरात पोहोचत आहे. मात्र हे लोक ज्या परिसरात राहतात, त्या परिसरातील नागरिक मात्र दहशतीत आहे. त्यामुळे प्रशासनापुढील अडचणी वाढल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.