कोणत्याही पक्षात अद्याप युती-आघाडी नाही
By Admin | Updated: October 5, 2015 02:39 IST2015-10-05T02:39:01+5:302015-10-05T02:39:01+5:30
नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून महागाव येथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

कोणत्याही पक्षात अद्याप युती-आघाडी नाही
महागाव : नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून महागाव येथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस उरले आहे. मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाची युती वा आघाडी झाली नाही. सर्वच पक्ष आणि आघाड्या या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेत दिसत आहे.
महागाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, परिवर्तन विकास आघाडी, जनआंदोलन आधार संघर्ष समिती रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. परिवर्तन विकास आघाडी वगळता कोणत्याही पक्षाजवळ आजही १७ प्रभागातील उमेदवार जुळून आले नाहीत. परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख माजी सरपंच रामराव नरवाडे यांनी १४ उमेदवार १५ दिवसापूर्वीच घोषित केले. उर्वरित तीन उमेदवार घोषित होणे बाकी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना १३, १५ व १६ प्रभागातून आवाहन आहे.
भाजपा सारख्या आणि सत्तेतील आमदार असूनही महागाव शहरात त्यांना खात्रीचे उमेदवार मिळाले नाही. शिवसेना किंवा अन्य पक्षातील नाराज उमेदवार शोधण्यासाठी भाजपाचे काही कार्यकर्ते फिरत असल्याची माहिती आहे. परिवर्तन विकास आघाडीने तिकीट नाकारलेल्यांची मनधरणी करण्यासाठी आमदाराला त्यांच्या घरापर्यंत जाण्याची वेळ आली आहे. सेनेने काही उमेदवारांवर मोहोर लावल्यानंतर भाजपामधील काही कार्यकर्ते त्यांना भाजपाची उमेदवारी देऊ करीत आहे. काँग्रेसने दोन बैठका घेतल्या असता तोच अनुभव येत आहे. नऊ महिला आणि त्यातही आरक्षित जागा असल्याने अनेक इच्छुकांजवळ जात पडताळणीचे अधिकृत प्रमाणपत्रच नाही. त्यामुळे वेळेवर सर्कस उभी करू पाहणाऱ्या पक्षांची अडचण होत आहे.
काँग्रेसचे खासदार अॅड. राजीव सातव, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी वगळता येथे कोणत्याही पक्षाचा मोठा नेता आला नाही. सर्वच १९ तारखेची वाट पाहत आहे. याच तारखेला नामांकन मागे घेता येईल व किती अर्ज राहिले त्यातून काही उमेदवार पार्टीसाठी घेता येते का यावर पक्षांचा कल दिसत आहे. नामांकन आॅनलाईन दाखल करायचे असून त्यासोबतच सर्व कागदपत्रे जोडायची आहे. आरक्षित जागेसाठी लागणारे कागदपत्रे जुळविण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले तरी भाजपा-सेना युतीची दोन वेळा चर्चा झाली. परंतु आमदार राजेंद्र नजरधने आणि सेनेचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांची स्पष्ट बैठक झाली नाही. खासदार भावना गवळी यांनी सेनेकडून स्पष्ट काय ती भूमिका आमदारांना सांगितली आहे. त्या उपरही भाजपाकडून काही सकारात्मक संदेश आलेला नाही. सेना सध्या तरी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. तीच गत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झालेली दिसते. या दोनही पक्षाची साधारण बैठक झाली नाही. परिवर्तन नगरविकास आघाडी व जनआंदोलन संघर्ष समितीने एकला चलो रेचा नारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत येणार हे निश्चित. (शहर प्रतिनिधी )