चोरीतील अर्धा किलो चांदीची ८०० रूपयांत विल्हेवाट
By Admin | Updated: September 1, 2014 23:55 IST2014-09-01T23:55:15+5:302014-09-01T23:55:15+5:30
एका जबरी घरफोडीत हाती लागलेली अर्धा किलो चांदीची चोरट्यांनी केवळ ८०० रुपयात विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे चांदीचा बाजारभाव सध्या ४५ हजार रुपये किलो आहे. स्वस्तात मिळालेली ही चांदी

चोरीतील अर्धा किलो चांदीची ८०० रूपयांत विल्हेवाट
यवतमाळ : एका जबरी घरफोडीत हाती लागलेली अर्धा किलो चांदीची चोरट्यांनी केवळ ८०० रुपयात विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे चांदीचा बाजारभाव सध्या ४५ हजार रुपये किलो आहे. स्वस्तात मिळालेली ही चांदी यवतमाळातील एका सुवर्ण कारागिराने खरेदी केली. मात्र हा प्रकार तीन विधी संघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या तावडीत सापडल्याने पुढे आला. शहर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने सोमवारी दुपारी त्या सुवर्ण कारागिराकडून ही चांदी जप्त केली.
सुनील भरणे रा. बेंडकीपुरा यवतमाळ असे चोरीतील चांदी खरेदी करणाऱ्या सुवर्ण कारागिराचे नाव आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री येथील बालाजी चौकातील पुरूषोत्तम निमोदिया यांच्या घराचे दार तोडून रोख २५ हजार आणि ५०० ग्रॅम चांदीच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी ओमप्रकाश निमोदिया यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान घटनेच्या तब्बल सात महिन्यानंतर शहर गुन्हेशोध पथकातील सहाय्यक फौजदार गुलाब पंधरे, शिपायी रामेश्वर भिसे यांना त्या घरफोडीत तीन विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून सोमवारी सकाळी संशयित तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी निमोदिया यांच्याकडील घरफोडीची कबुली देऊन चोरीतील चांदी विक्रेत्याचे नावही पोलिसांपुढे उघड केले. त्यावरून अल्प किमतीत विक्री केलेली चोरीतील ५०० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे बाजारात चांदीचा दर ४५ हजार रुपये किलो आहे. अत्यल्प किमतीत चांदी मिळाल्याने सुवर्णकारागिराने ती सहजपणे विकत घेतली. (स्थानिक प्रतिनिधी)
पाठ थोपटून घेण्यासाठी फौजदाराचा खोटरडेपणा
यापूर्वी तीन चोरट्यांना अटक करून स्थानिक गुन्हे शाखेतील एका फौजदाराने त्यांच्याकडून जबरी चोरीतील १० ते १२ घटनांची कबुली घेतल्याचे रेकॉर्ड तयार केले. त्या रेकॉर्डमध्ये निमोदिया यांच्याकडील चोरीचाही समावेश होता. सद्या संबंधित चोरटे वडगाव रोड पोलिसांच्या ताब्यात आहे. ते शहर पोलिसांच्या ताब्यात येण्यापूर्वीच भलत्याच विधी संघर्ष बालकांकडून या चोरीची कबुली आणि ऐवज जप्त झाला. केवळ वरिष्ठांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी त्या फौजदाराने हा अधाशीपणा केल्याची ओरड खुद्द पोलिसातूनच होेत आहे.