ठाण्यातून स्टेशन डायरी हद्दपार
By Admin | Updated: August 23, 2015 02:29 IST2015-08-23T02:29:38+5:302015-08-23T02:29:38+5:30
पोलीस ठाण्यांमधील ब्रिटिशकालीन स्टेशन डायरी आता हद्दपार होत आहे. या स्टेशन डायरीची जागा आता संगणकातील आॅनलाईन एफआयआरने घेतली आहे.

ठाण्यातून स्टेशन डायरी हद्दपार
आता आॅनलाईन एफआयआर : जिल्ह्यातील १७ पोलीस ठाण्यांमध्ये सेवा सुरू
यवतमाळ : पोलीस ठाण्यांमधील ब्रिटिशकालीन स्टेशन डायरी आता हद्दपार होत आहे. या स्टेशन डायरीची जागा आता संगणकातील आॅनलाईन एफआयआरने घेतली आहे.
राज्यातील सर्व पोलीस ठाणे ३० सप्टेंबरपूर्वी आॅनलाईन होणार आहेत. या ठाण्यातील प्रत्येक काम हे संगणकामार्फत होणार आहे. भल्या मोठ्या डायरीत गुन्ह्याच्या नोंदी घेणे आता लवकरच या पोलीस ठाण्यांच्या दृष्टीने कालबाह्य ठरणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सर्व २९ पोलीस ठाणे आॅनलाईन पद्धतीने जोडले जाणार आहेत. तेथील एफआयआर संगणकावर फिड करून लगेच त्याची प्रतही फिर्यादीला उपलब्ध करून दिली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बिटरगाव, आर्णी, कळंब, वडगाव रोड, वडगाव जंगल, यवतमाळ शहर, यवतमाळ ग्रामीण, वडकी, घाटंजी, वणी, शिरपूर, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, पोफाळी आदी १७ पोलीस ठाण्यांमध्ये १९ आॅगस्टपासून आॅनलाईन एफआयआर नोंदविणे सुरू झाले आहे. उर्वरित पोलीस ठाणेही दुसऱ्या टप्प्यात आॅनलाईन होणार आहे. सीसीटीएनएस या यंत्रणेद्वारे पोलीस ठाणे आॅनलाईन करण्याचे काम सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात आणि त्यातही दुर्गम क्षेत्रातील दराटी-बिटरगाव सारख्या पोलीस ठाण्यांमध्ये इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ते कायम मिळावे यासाठी पोलीस यंत्रणा भारत संचार निगम लिमिटेडच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांच्या थेट नियंत्रणात पोलीस ठाणे आॅनलाईन करण्याचे काम केल जात आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक व संबंधितांना प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आॅनलाईन एफआयआर पद्धती सुरू झाली असली तरी सध्या नेटवर्कची अडचण असल्याने काही दिवस सोबतीला परंपरागत स्टेशन डायरीही ठेवली जाणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांना सराव होताच व नेटवर्कची अडचण दूर होताच ही डायरी हद्दपार केली जाणार असल्याचे गृह पोलीस उपअधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
कागदांसाठीचा तगादा संपणार
कुणीही फिर्यादी पोलीस ठाण्यात गेला आणि त्याची खरोखरच तक्रार लिहून घ्यायची असेल तर आधी संबंधित पोलीस कर्मचारी त्याला कोरे कागद आणण्यासाठी पाठवितो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. कुटुंबातील एखादा सदस्य मृतावस्थेत आढळला, त्याने आत्महत्या केली याची माहिती देण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांनाही अनेकदा या कागद विकत आणण्याच्या कटकटीतून मूभा दिली जात नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. मात्र आॅनलाईन एफआयआर पद्धतीमुळे फिर्यादीनेच कागद खरेदीच्या भानगडी थांबणार आहे.