ठाणेदाराने ताणली पोलीस शिपायावर रिव्हॉल्वर
By Admin | Updated: September 24, 2014 23:42 IST2014-09-24T23:42:37+5:302014-09-24T23:42:37+5:30
अपुरे मनुष्यबळ, त्यामुळे महत्वाचे काम असूनही न मिळणाऱ्या सुट्या, रिलीव्हरची कमतरता, त्यातून वाढणारे कामाचे तास, सलग करावी लागणारी ड्युटी, यातून वाढणारा ताण-तणाव पोलीस दलात जीवघेणा ठरू शकतो.

ठाणेदाराने ताणली पोलीस शिपायावर रिव्हॉल्वर
हमीद खॉ पठाण - अकोलाबाजार
अपुरे मनुष्यबळ, त्यामुळे महत्वाचे काम असूनही न मिळणाऱ्या सुट्या, रिलीव्हरची कमतरता, त्यातून वाढणारे कामाचे तास, सलग करावी लागणारी ड्युटी, यातून वाढणारा ताण-तणाव पोलीस दलात जीवघेणा ठरू शकतो. याचा प्रत्यय वडगाव जंगल पोलीस ठाण्यात मंगळवारी आला. ड्युटी लावण्यावरून ठाणेदाराने चक्क पोलीस कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्वर ताणली. अखेर सदर कर्मचाऱ्याने या प्रकरणाची आपल्या वरिष्ठांकडे मौखिक तक्रार नोंदविली आहे.
वडगाव जंगल पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता हा प्रकार घडला. एका पोलीस कर्मचाऱ्याने रात्री ड्युटी पूर्ण केली. त्याला घरी जायचे होते. परंतु त्याचा रिलीव्हर अर्थात दुसरा कर्मचारी आला नाही. कारण त्या कर्मचाऱ्याची आजी अचानक वारली. इकडे ठाणेदारालाही आरोपीच्या शोधात जवळा (ईजारा) येथे जायचे होते. म्हणून दुसरा कर्मचारी येईपर्यंत तुम्ही थांबा, अशी सूचना ठाणेदाराने त्या कर्मचाऱ्याला केली. नेमक्या याच कारणावरून वाद उद्भवला. ठाणेदार व कर्मचाऱ्यात तू-तू-मै-मै झाली. ठाणेदाराची विनंती धुडकावून सदर पोलीस कर्मचारी आपल्या निवासस्थानाकडे जात असताना ठाणेदाराचाही संताप अनावर झाला. त्यातच संयम सुटल्याने त्यांनी या कर्मचाऱ्यावर आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर रोखल्याचे पोलीस वर्तुळातून सांगितले जाते. ठाणेदाराने मात्र हा आरोप फेटाळला आहे. सदर कर्मचाऱ्यास रिलीव्हर येईस्तोवर ड्युटी करा, असे बजावले होते. मात्र रिव्हॉल्वर रोखल्याचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सोबतच अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग, मोठे कार्यक्षेत्र, सोईसुविधांचा अभाव, कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करताना होणारी तारेवरची कसरत, त्यातून निर्माण होणारे गैरसमज याबाबतही ठाणेदाराने आपले मन सदर प्रतिनिधीकडे मोकळे केले.
वडगाव (जंगल) पोलीस ठाण्यात ड्युटीचा वाद नेहमीच ऐकायला मिळतो. या ठाण्यात २७ कर्मचारी तैनात आहेत. त्यातील काही कर्मचारी साप्ताहिक रजा, इतर रजा यामुळे उपलब्ध होत नाहीत. स्टेशन डायरी, वायरलेस ड्युटी, आरोपी गार्ड ड्युटी, कोर्ट ड्युटी यात अनेक कर्मचारी व्यस्त असतात. त्यामुळे एका पाळीला अवघे बोटावर मोजण्याऐवढे कर्मचारी उपलब्ध होतात.
त्यातच पोलीस ठाण्याचा अवाका दोन-तीन तालुक्यात असल्याने काम करताना अडचण निर्माण होते. अनेकदा सलग ड्युटी करावी लागत असल्याने आणि वेळीच रिलीव्हर उपलब्ध होत नसल्याने पोलिसांमध्ये ताण-तणाव वाढतो. त्यातूनच संतापाच्या भरात अशा घटनांना खतपाणी मिळते. ही समस्या जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यांची आहे.