प्रवेशाचे टेंशन

By Admin | Updated: May 31, 2015 02:15 IST2015-05-31T02:15:13+5:302015-05-31T02:15:13+5:30

बारावीचा निकाल जाहीर झाला. मागील ६८ वर्षातील जिल्ह्याच्या निकालाचे उच्चांक मोडले. या निकालासोबतच काही प्रश्नही निर्माण झाले आहेत.

Tension of entry | प्रवेशाचे टेंशन

प्रवेशाचे टेंशन

मिशन अ‍ॅडमिशन : क्षमता केवळ १७ हजार, उत्तीर्ण २२ हजार
रूपेश उत्तरवार यवतमाळ
बारावीचा निकाल जाहीर झाला. मागील ६८ वर्षातील जिल्ह्याच्या निकालाचे उच्चांक मोडले. या निकालासोबतच काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी आहे. गतवर्षी तुकडया वाढवून प्रवेश क्षमता वाढविली. यावर्षी वाढीव तुकड्यांमध्येही विद्यार्थी सामावले जाणार नाही, अशी स्थिती आहे. प्रवेश क्षमता १७ हजार व उत्तीर्ण २२ हजार ६७८ विद्यार्थी यामुळे पाच हजार ६७८ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशास मुकावे लागण्याचा धोका आहे.
१५ जूनपासून बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रक्रिया सुरू होताच काही दिवसात संपूर्ण वर्ग हाऊसफुल्ल होतील. याचे कारणही तसेच आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेपेक्षाही अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे जिल्ह्यात ६७ महाविद्यालये आहेत. यात कला शाखेचे २० महाविद्यालये असून याठिकाणी १२ अतिरिक्त तुकड्या मंजूर करण्यात आल्या. त्यामुळे महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ३८४० झाली. वाणिज्य शाखेच्या पदवी शिक्षणासाठी ३० महाविद्यालये आहेत. याठिकाणी गतवर्षी १२ अतिरिक्त तुकड्या वाढविल्या. यामुळे याठिकाणची प्रवेश क्षमता ३६०० वरून ५०४० वर पोहोचली. विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमासाठी १७ महाविद्यालये आहेत. यात १२ अतिरिक्त तुकड्या वाढल्याने महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २०४० वरून ३४८० झाली.
कला-वाणिज्य-विज्ञान शाखेच्या एकूण १०९२० जागा आहे. जिल्ह्यात २२ ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामुळे अर्ध्याअधिक विद्यार्थ्यांना तुकड्या वाढविल्यानंतरही प्रवेश मिळणे अशक्य आहे. यासोबतच बारावीनंतर प्रवेश मिळविण्यासाठी इतर अभ्यासक्रम आहेत.
यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालये, फार्मसी कॉलेज, बीसीए, समाजकार्य, कृषी, डेअरी टेक्नॉलॉजी, लॉ, नर्सिंग आणि डीएडचा पर्याय खुला आहे. याठिकाणी सात हजार ३२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
यानंतरही पाच हजार ५४८ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण होणार आहे. याकरिता विद्यापीठाकडे आणखी अतिरिक्त तुकड्यांची मागणी महाविद्यालयांना करावी लागणार आहे. याला परवानगी मिळाल्यानंतरच प्रवेशाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Web Title: Tension of entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.