पावसाने कळंब-आर्णी येथे तूर भिजली
By Admin | Updated: June 3, 2017 00:46 IST2017-06-03T00:46:10+5:302017-06-03T00:46:10+5:30
शुक्रवारी आर्णी व कळंब शहरात दुपारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे या दोनही शहरातील

पावसाने कळंब-आर्णी येथे तूर भिजली
बाजार समिती यार्ड : नाफेड व शेतकऱ्यांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी/कळंब : शुक्रवारी आर्णी व कळंब शहरात दुपारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे या दोनही शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उघड्यावर असलेले हजारो तुरीचे पोते ओले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांसह नाफेडचे लाखो रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आर्णी येथे शुक्रवारी दुपारी चांगलाच पाऊस झाला. त्यामध्ये बाजार समितीच्या यार्डात असलेल्या तुरीचे नुकसान झाले. वेळेवर ताडपत्री टाकून ही तूर वाचविण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. परंतु त्याचा फायदा झाला नाही. मागील दोन दिवसांपासून तूर खरेदी बंद असून शुक्रवारी केवळ तीन शेतकऱ्यांच्या तुरीची मोजणी करण्यात आली. तूर खरेदीची शासनाकडून परवानगीच नसल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात येते. याप्रकरणात दोन दिवसांपूर्वी बाजार समितीच्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्यांनी मारहाण केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. तूर खरेदी सुरू असताना सतत वाद होत असल्याने ३१ मेपासून तूर खरेदी बंद आहे.
कळंब येथे शुक्रवारी दुपारी पावसाचा चांगलाच ठोक आला. गेल्या काही दिवसांपासून नियमित शेतकऱ्यांच्या तुरीची मोजणी होत नसल्याने हजारो तुरीचे पोते बाजार समितीच्या आवारात होती. अचानक आलेल्या या पावसामुळे ही पोती ओली झाली. उल्लेखनीय म्हणजे नाफेडने यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर खरेदी केली होती आणि नाफेडचाही खरेदी केलेला माल बाजार समितीच्या आवारातच पडून होता. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच नाफेडचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.