वनविभागाच्या अनागोंदीने अखेर तस्कराचा जामीन
By Admin | Updated: September 29, 2014 00:51 IST2014-09-29T00:51:46+5:302014-09-29T00:51:46+5:30
राखीव वनातील दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून भीषण कत्तल करण्यात आली. या घटनेला दोन महिने उलटूनही वनविभागाला त्या तस्कराच्या मुसक्या आवळता आल्या नाही.

वनविभागाच्या अनागोंदीने अखेर तस्कराचा जामीन
हिवरी : राखीव वनातील दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून भीषण कत्तल करण्यात आली. या घटनेला दोन महिने उलटूनही वनविभागाला त्या तस्कराच्या मुसक्या आवळता आल्या नाही. त्यातूनच सवड मिळाल्याने तो जामीन मिळविण्यात यशस्वी झाला. सद्यस्थितीत त्याची चौकशीसाठी हिवरी वनपरिक्षेत्र कार्यालयात ये-जा आहे. मात्र हितसंबंध उघड होतील या भितीने प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे.
यवतमाळ वनविभागातील हिवरी वनपरिक्षेत्रातील मनदेव बिटमधील राखीव वनातील कक्ष क्रमांक ४९७ आणि लगतच्या जंगलात तब्बल दोनशेवर सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. लाखो रुपये किमतीच्या सागवान लाकडांच्या ट्रकव्दारे दोन खेप गेल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने हा प्रकार उजेडात आला.
त्यानंतर तस्कर तिसरी खेप नेत असताना ट्रक फसल्याने पुन्हा दूसरी कत्तल उघडकीस आली. या घटनाक्रमाला आजघडीला दोन महिन्यांचा कालावधी उलटला. तस्कराचे नाव, गाव, पत्ता आणि आश्रयस्थाने यांची माहिती असताना वनविभागाने त्याला हूडकून काढले नाही.
परिणामी सवड मिळाल्याने सुरूवातीला त्या तस्कराने येथील न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्याच्या अर्जावर सुनावनी करताना न्यायालयाने काही अटी आणि शर्ती ठेऊन त्याला जामीन मंजूर केला. तसेच चौकशीसाठी नियमित हिवरी वनपरिक्षेत्र कार्यालयात हजर रहावे असेही त्या आदेशात म्हटले आहे. त्यावरून मुळचा नांदेड येथील संबंधित तस्कर चौकशीसाठी हजर होत आहे.
वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी असलेल्या हितसंबंधातून त्याने पहिल्या कत्तलीतील लाकूडसाठा वाहून नेलेला ट्रक कुठे दडवून ठेवला याची माहिती वनाधिकाऱ्यांपुढे उघड केली. त्यातूनच नांदेड येथील मुखेड जवळच्या एका तांड्यावरून ट्रक (क्र. एमएच २६ एडी १०७९) जप्त करण्यात आला.
तसेच त्याच्या दोन साथिदारांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. एरव्ही मोळी पकडली तरी कारवाईचा गवगवा करणारे वनाधिकारी आणि कर्मचारी यावेळी मात्र मुग गिळून गप्प आहेत. ट्रकची जप्ती करूनही त्याची वाच्यता केली जात नाही.
वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तस्कराशी असलेले हितसंबंध उघड होतील या भितीने हा प्रकार केला जात असल्याचे खुद्द वनविभागातून सांगण्यात आले. (वार्ताहर)