शेतकऱ्याच्या आत्महत्येचा तलाठी व लिपिकावर गुन्हा

By Admin | Updated: June 24, 2015 00:06 IST2015-06-24T00:06:44+5:302015-06-24T00:06:44+5:30

तालुक्यातील घोडधरा येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी तलाठी व तहसीलच्या लिपिकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पांढरकवडा पोलिसांनी दाखल केला आहे.

Talathi's crime of farmer suicides and crime on scripts | शेतकऱ्याच्या आत्महत्येचा तलाठी व लिपिकावर गुन्हा

शेतकऱ्याच्या आत्महत्येचा तलाठी व लिपिकावर गुन्हा

घोडधराचे प्रकरण : चिठ्ठीत मात्र सरकार जबाबदार असल्याचा उल्लेख
पांढरकवडा : तालुक्यातील घोडधरा येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी तलाठी व तहसीलच्या लिपिकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पांढरकवडा पोलिसांनी दाखल केला आहे. गत ६ जून रोजी माधव तुकाराम गोडे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी शासनास जबाबदार धरले होते.
तालुक्यातील घोडधरा येथील माधव गोडे या वृद्ध शेतकऱ्याने ६ जून रोजी सकाळी ९ वाजता गावशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुरुवातीला पांढरकवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. तपासादरम्यान मृतक माधव गोडे यांच्या खिशातील प्लॉस्टिक पिशवीत गुंडाळून ठेवलेली स्वहस्ताक्षरातील चिठ्ठी पोलिसांना मिळाली होती.
त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपले नुकतीच आपल्यावर शस्त्रक्रिया झाली असून पुन्हा जनावर हाकताना पाय घसरून पडल्यामुळे डावा हात फ्रॅक्चर होऊन कंबरेला मार लागला. या सर्व बाबींकरिता खूप पैसे लागले. त्यामुळे आपण कर्जबाजारी झालो. त्यातच सायखेडा येथील मध्यवर्ती बँकेमार्फत आदिवासी सोसायटी तेलंगटाकळीकडून शेतीकरिता सन २००८-०९ मध्ये ७० ते ७५ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. सोबतच हात उसणवारीचे पैसे मिळवून आपल्यावर एक लाख ३० हजार रूपयापर्यंत कर्ज झाल्याचे नमूद होते. यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या काळजीत ते राहात होते.
त्याचप्रमाणे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतीत झालेली नापिकी व शेतीतून निघालेल्या पिकांना कमी भावामुळे माधव गोडे पूर्णत: खचून गेले होते. त्यांनी शासनाकडून वेळोवेळी जाहीर झालेल्या नापिकीचा मोबदला मिळेल, याची वाट पाहिली. मात्र कोणतीही कर्जमाफी, मोबदला गोडे यांना मिळाला नाही. त्यामुळे ते खचून गेले होते. त्यामुळे ‘आपल्या आत्महत्येस शासन जबाबदार राहील’, असे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. परिणामी त्यांच्या मृत्यूप्रकरणी २२ जून रोजी त्यांचा मुलगा उमेश गोडे याने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून व तपासावरून येथील तहसीलमधील लिपीक एस.जी.भगत आणि तलाठी एम.डब्ल्यू.भगत यांना जबाबदार धरून त्यांनी शासनाकडून मिळालेल्या पैशापासून माधव गोडे यांना वंचित ठेवल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवत या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)

चिठ्ठीत लिहिले वास्तव
शेतकरी माधव गोडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आजपर्यंत कर्जमाफी मिळण्याची वाट बघत होतो. मात्र कर्जमाफी मिळाली नाही. अखेर मी आत्महत्या करीत आहे, माझ्या आत्महत्येचा विचार करून इतर कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असे लिहिले होते. विदर्भातील शेतकऱ्यांचे वास्तव आपल्या चिठ्ठीत माधवने लिहिले होते.

Web Title: Talathi's crime of farmer suicides and crime on scripts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.