साखरेचा गोडवा झाला कमी
By Admin | Updated: August 14, 2015 02:40 IST2015-08-14T02:40:27+5:302015-08-14T02:40:27+5:30
गेल्या सात दिवसांत साखरेच्या भावात ४०० ते ६०० रूपये प्रति क्विंटल वाढ झाल्याने साखरेचा गोडवा कमी झाला आहे.

साखरेचा गोडवा झाला कमी
भाव वधारले : तुरडाळीच्या भावात विक्रमी वाढ, सामान्यांचे मोडले कंबरडे
नीलेश यमसनवार पाटणबोरी
गेल्या सात दिवसांत साखरेच्या भावात ४०० ते ६०० रूपये प्रति क्विंटल वाढ झाल्याने साखरेचा गोडवा कमी झाला आहे. साखर आता कडू झाली आहे. येत्या काही दिवसात साखर ३० रूपये प्रति किलोवर जाण्याचे संकेत प्राप्त होत आहे. सोबतच तुरडाळीच्या दरातही विक्री वाढ झाल्याने सामान्य जनतेच्या ताटातून वरणच गायब होण्याची शक्यता आहे.
भारत सरकारने साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यानुसार इराण देशाला ४० लाख टन साखर निर्यात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परिणामी आता अचानक साखरेच्या दरात रेकॉर्ड ब्रेक भाववाढ होत आहे. गेल्या सात दिवसांपूर्वी घाऊक बाजारात दोन हजार १०० रूपये प्रती क्विंटल दर असलेली साखर आता दोन हजार ५५० रूपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. परिणामी किरकोळ दरात २५ रूपये प्रति किलोप्रमाणे मिळणारी साखर आता ३० रूपये दराने विकत घ्यावी लागत आहे. साखरेचे दर वाढल्याने चहाची गोडी कमी होत आहे. अचानक झालेल्या भाववाढीमुळे कारखानदार, दलाल, साठेबाज यांची मात्र चांदी झाली आहे. दुसरीकडे साखरेचा गोडवा कमी झाल्याने सामान्य जनतेला ती कडू लागत आहे.
साखरेसोबतच गेल्या आठवडाभरात तुरडाळीचे भावही वधारले आहेत. एक हजार ५०० रूपये क्विंटलने तुरडाळीचे दर वाढले आहेत. आठवडाभरापूर्वी घाऊक बाजारात १०० रूपये प्रती किलोप्रमाणी मिळणारी तुरडाळ आता ११५ रूपये प्रती किलोवर पोहोचली आहे. किरकोळ बाजारात तर तुरडाळ १२० ते १३० रूपये प्रति किलोप्रमाणे विकली जात आहे. तुरडाळीच्या भाववाढीमुळे अन्य सर्वच डाळींचे भावही वधारले आहेत. येत्या काही दिवसात सर्वच डाळींच्या दरात पुन्हा वाढ होण्याचे संकेत मिळत आहे.
यासोबतच शेंगदाणा १०० रूपये, फुटाणा ८०, पोहा ४०, खोबरा १८० रूपये प्रति किलोप्रमाणे विकला जात आहे. अन्नधान्य व डाळींच्या किंमती चांगल्याच वाढल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेटच कोलमडून पडले आहे. डाळींसोबतच भापिालाही महागला आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणासाठी नेमकी कोणती भाजी करावी, असा प्रश्न महिलांना सतावत आहे. डाळी महागल्याने सामान्य जनतेच्या ताटातून आता वरणच गायब होण्याची शक्यता बळावली.