अपमानाच्या बदल्यासाठी मित्रानेच घातले सत्तुराचे घाव
By Admin | Updated: January 15, 2017 01:14 IST2017-01-15T01:14:36+5:302017-01-15T01:14:36+5:30
स्वत:कडे असलेल्या संपन्नतेचा, सुदृढ देहयष्टीचा चुकीचा वापर केल्यास जवळचा मित्रही शत्रू बनतो. स्वत:च्या क्षमतेचा उपयोग

अपमानाच्या बदल्यासाठी मित्रानेच घातले सत्तुराचे घाव
स्वत:कडे असलेल्या संपन्नतेचा, सुदृढ देहयष्टीचा चुकीचा वापर केल्यास जवळचा मित्रही शत्रू बनतो. स्वत:च्या क्षमतेचा उपयोग इतरांना मदतीसाठी केला तर त्याचे सकारात्मकच परिणाम दिसून येतात. दिग्रस तालुक्यातील मोख येथील समाधान श्रीराम भगत याने स्वत:च्या शारीरिक सक्षमतेचा उपयोग केवळ चारचौघात मित्राचा पाणउतारा करण्यासाठी केला. सोबतच्यांना तुच्छ वागणूक देणे समाधानला भोवले. त्याच्या शब्दासाठी धावून येणाऱ्या मित्रानेच सततच्या अपमानाची सल काढून टाकण्यासाठी सापळा रचला. यात बेसावध असलेला समाधान अलगद फसला आणि त्याला जीव गमवावा लागला.
मैत्रीचा धागा रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट असतो. त्यामुळेच समाजात मैत्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाच्या यशस्वीतेचं परिमान हे त्याच्याकडे असणारा मित्राचा गोतावळाच आहे. संकटात सर्वात पहिली मदतीसाठी पुढे येणारा मित्रच असतो. मैत्रीत गमती जमतीत ऐकमेकांची टरही उडविली जाते. आपली समाजातील प्रतिष्ठा याचे भान मित्रांपुढे ठेवले जात नाही. मात्र ही गमत जमतही एका चाकोरीबाहेर गेल्यानंतर अघटीत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
दिग्रस तालुक्यातील मोख या लहानशा गावात घराच्या शेजारीच राहणारे दोन मित्र दोघांचेही कुटुंब रोजमजुरीवर उदरनिर्वाह करणारे. दोघांनीही कुटुंबात कर्त्याची भूमिका निभावून आपल्या बहिणींचे लग्न लावून दिले. भल्या पहाटे उठून रोजगाराचा शोध घ्यायचा अन् हाताला मिळेल ते काम करायचे, असा या दोघांचा नित्यक्रम होता. या घटनेतील मृतक समाधान श्रीराम भगत (३४) हा गवंडी काम करत होता. तर त्याच्या शेजारीच राहणारा आरोपी कैलास विश्राम भगत (३०) हा पेंटींग आणि घराचे रंगकाम करत असते. त्यामुळे व्यवसायानेही हे दोघे सतत एकमेकांच्या संपर्कात राहात. समाधानच्या घरी दोन बहिणींच्या विवाहानंतर केवळ वृद्ध आई आहे. तर कैलासकडे पाच बहिणींच्या विवाहानंतर वडील आहेत. अशा मिळत्या जुळत्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून हे दोन मित्र मधूनमधून श्रम परिहारासाठी मद्यपान करत होते. शरीरयष्टीने धडधाकट असलेला समाधान नेहमीच त्याच्या शेजारी राहणाऱ्या कैलासची टर्र उडवित होता. कैलासला याचे काही वाटायचे नाही. नंतर मात्र समाधानने बोलण्याची मर्यादा ओलांडली. तो कैलासच्या विवाहित बहिणींबद्दल अपशब्द वापरू लागला. बहिणी माहेरी आल्या असता त्यांच्याबाबत उलटसुलट विचारणा करायचा. चारचौघात जाणीवपूर्वक कैलासला त्याच्या कुटुंबीयांबाबत नको त्या पद्धतीने विचारणा करत होता. कैलासने याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला असता समाधान हातापायीवर येत होता. शारीरिक क्षमता नसल्याने कैलास याचा जाब कधीच विचारू शकला नाही. हीच खदखद कैलासच्या मनात घर करून बसली. त्याने कुठल्याही परिस्थितीत समाधानचा काटा काढायचा, असा बेत मनोमन आखला.
कैलास संधीच्या शोधात होता. त्याने गावातील एका मित्राकडून कोंबडा कापण्यासाठी म्हणून मोठा सुरा घरी आणून ठेवला. समाधानला त्याची पुसटशीही कल्पना आली नाही. ५ जानेवारीच्या रात्री कैलासने समाधानला सोबत दारू पिण्यासाठी जाण्याची आॅफर दिली. गावातील दारूच्या गुत्यावर जावून कैलासने समाधानला भरपूर दारू पाजली. मित्रच पैसे देणार असल्याने समाधाननेही पितांना कोणतीच कसर सोडली नाही. शेवटी तर्र झाल्यानंतर दोघेही घराकडे जाण्यासाठी निघाले. जाताना एका चौकातच समाधान झोपला. नंतर कैलास घरी आला. गाव सामसुम झाल्यानंतर १० वाजताच्या सुमारास त्याने घरात ठेवलेला सत्तूर घेवून तर्र होवून पडलेल्या समाधानला गाठले. त्याच्या तोंडावर हात ठेवून मानेवर सत्तुराने घाव घातले. त्यानंतर कैलासने घरी येवून रक्ताने माखलेला सत्तूर धुवून ठेवला. रक्ताने भिजलेला शर्ट जाळून टाकला. दुसऱ्या दिवशी ही खुनाची घटना उघडकीस आली.
या प्रकरणाचा तपास दिग्रस पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात फौजदार दिनेश चव्हाण, जमादार उमेश चव्हाण, दत्ता पवार यांनी केला. आरोपी कैलासकडून गुन्ह्यात वापरलेला सुरा, रक्ताने माखलेली गोधडी असे पुरावे गोळा केले. या घटनेनंतर कैलासला पोलिसांनी अटक केली आहे.