सर्वेक्षण खूप झाले, आता अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:21 IST2017-12-19T23:20:29+5:302017-12-19T23:21:37+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सर्वेक्षणे खूप झाली, आता अंमलबजावणीची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणेने योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

सर्वेक्षण खूप झाले, आता अंमलबजावणी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सर्वेक्षणे खूप झाली, आता अंमलबजावणीची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणेने योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.
विधान भवनात आयोजित यवतमाळ जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, विधान परिषद सदस्य हरीभाऊ राठोड, ख्वाजा बेग, तानाजी सावंत, विधानसभा सदस्य मनोहरराव नाईक, डॉ.अशोक उईके, राजेंद्र नजरधणे, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, मुख्य सचिव सुमित मल्लीक, अतिरिक्त्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या विषयात सर्वेक्षण सुरू आहे. ते बहुतांश विषय शेतीशी संबंधित आहे. परंतु आता सर्वेक्षणे खूप झाली, त्यातील प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
बोंडअळीचा उल्लेखही नाही
नागपुरातील या बैठकीमध्ये देशभर गाजलेल्या कीटकनाशक फवारणी मृत्यू आणि कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याचा कोणताही विषय निघाला नाही. आमदारांपैकीही फारसे कुणी बोलले नसल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक
बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे कौतुक केले. देशमुख यांच्या नेतृत्वात चांगले काम होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.