काँग्रेसची शरणागती
By Admin | Updated: September 22, 2014 23:25 IST2014-09-22T23:25:47+5:302014-09-22T23:25:47+5:30
विधानसभेत राष्ट्रवादीच्या मदतीची गरज भासेल या एकमेव स्वार्थापोटी जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनी राष्ट्रवादीपुढे शरणागती पत्करल्याचे विदारक चित्र रविवारी जिल्हा परिषदेत पहायला मिळाले.

काँग्रेसची शरणागती
जिल्हा परिषद: आमदारांच्या स्वार्थाने हुकविली कार्यकर्त्यांची संधी
यवतमाळ : विधानसभेत राष्ट्रवादीच्या मदतीची गरज भासेल या एकमेव स्वार्थापोटी जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनी राष्ट्रवादीपुढे शरणागती पत्करल्याचे विदारक चित्र रविवारी जिल्हा परिषदेत पहायला मिळाले.
जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार हे निश्चित होते. मात्र अध्यक्ष काँग्रेसचा व्हावा म्हणून पाचही आमदारांकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. वास्तविक काँग्रेसकडे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. मात्र युद्धापूर्वीच काँग्रेस आमदारांनी राष्ट्रवादीपुढे शस्त्रे टाकली. यामागे पाचही आमदारांचा वैयक्तिक स्वार्थ दिसून आला. कारण तीन आठवड्यांनी विधानसभेची निवडणुक होत आहेत. त्यासाठी आघाडी झाल्यास काँग्रेसला राष्ट्रवादीची मदत लागणार आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी सहा जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. तर पुसद या एकमेव जागेवर राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार राहील. ही आमदारकी कायम ठेवण्यासाठी कोणतीही तडजोड स्वीकारण्यास काँग्रेसचे पाचही आमदार तयार आहेत. राष्ट्रवादीला बिनशर्त अध्यक्षपद बहाल करणे हा या तडजोडीचाच एक भाग मानला जातो. आमदारांची ही भूमिका पाहता एखादवेळी राष्ट्रवादीने उपाध्यक्ष पदही स्वत:साठी मागितले असते तर काँग्रेसने त्याला फार काही विरोध केला नसता, असा अंदाज राजकीय क्षेत्रात वर्तविला जात आहे. विधानसभेच्या राजकारणापायी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर पाणी सोडल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
यवतमाळ हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा गृहजिल्हा आहे. सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे आहेत. त्यातही दोघांकडे लालदिवा आहे. विद्यमान आमदारांपैकी तीन जण दीर्घ अनुभवी आहेत. काँग्रेसची एवढी अनुभवी फौज आणि सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा न सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमदारांनी केवळ आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मिळणारा अध्यक्षपदाचा सन्मान, संधी हिरावून घेतल्याचा संतप्त सूर काँग्रेसच्याच गोटातून ऐकायला मिळत आहे. यातील काँग्रेसच्या एका अभ्यासू आमदाराने मात्र राष्ट्रवादीपुढे एवढे नमते घेण्याची आवश्यकता नाही, अशी ताठर भूमिका मांडली होती. मात्र अन्य आमदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. नेत्यांच्या या स्वार्थी वृत्तीविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पहायला मिळत आहे. आता सभापती निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)