जुलैमध्ये यवतमाळ जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांची आत्महत्या
By Admin | Updated: July 20, 2015 02:29 IST2015-07-20T02:29:47+5:302015-07-20T02:29:47+5:30
चालू जुलै महिन्यात पाऊसाने दगा दिल्यानंतर आता विदर्भात दुबार पेरणीचे संकट अधिकच भीषण झाले आहे.

जुलैमध्ये यवतमाळ जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांची आत्महत्या
विजसची माहिती : विदर्भात दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या, शासन शेतकऱ्यांप्रती गंभीर नसल्याचा आरोप
यवतमाळ : चालू जुलै महिन्यात पाऊसाने दगा दिल्यानंतर आता विदर्भात दुबार पेरणीचे संकट अधिकच भीषण झाले आहे. मागील १५ दिवसापासून दर आठ तासाला एक कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहे. मागील ४८ तासात विदर्भात आणखी सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली आहे.
यामध्ये यवतमाळ जिल्हयातील बोरीअरबचे श्रीकृष्ण इंगळे, टाकळीचे भाऊराव बंडेकर व बिटरगावचे राजाराम भलगे या तीन शेतकऱ्यांचा तर वाशीम जिल्हयातील काक येथील महिला शेतकरी दुर्गाबाई देशमुख व मुंगडा येथील संदीप शेळके या दोन शेतकऱ्यांच्या व अमरावती जिल्हयातील पापडचे अजय खाप्रीकार यांचा समावेश आहे. जुलै महिन्यातच विदर्भात ३८ तर एकट्या यवतमाळ जिल्हयात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यातसुद्धा यवतमाळ जिल्हयात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारी नोंद असून यात जुलै महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाटखेड गावात एका पाठोपाठ एक दोन आत्महत्या झाल्या.
सध्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारातही उभे करीत नसून आतातर भारत सरकारच्या वतीने केंद्रीय वित्त सचिव डॉ. हसमुख अढिया यांनी ८ जुलै रोजी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना पत्र लिहून राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज वाटपासाठी महाराष्ट्र सरकारने सक्ती करू नये, अशा सूचना राज्यातील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्याबाबत सुचविले आहे. यामुळे राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देत आहे व बँकाविरूद्ध कारवाई करू, अशी ओरड करणारे भाजप सरकारचे मंत्री आता यावर बोलण्यास तयार नाही, ही शोकांतिका असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
विदर्भ जनआंदोलन समितीने जुलै महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची यादीच पाठविली आहे. दिनेश धोंडे पोरगव्हान वर्धा, संतोष चटुले शेंदूरजना, अमरावती, पांडुरंग मडावी वाटखेड, यवतमाळ , अमोल वायले शिरसगाव, यवतमाळ, श्यामराव कोराडे भिवापूर, अमरावती, सतीश सिद्धराम गोहद, वर्धा, मारोतराव येटरे पांढरी, यवतमाळ, हरिहर करडे देऊळगाव, अकोला, नारायण ठाकरे पिंपळ विहीर, अमरावती, मौह्मद अखिल सौदागर काटपूर, अमरावती, प्रकाश चव्हाण कंधारी, यवतमाळ, अंतराम टेकाम आलेन्दूर, भंडारा, सतीश पोखले रोहीखेड, बुलढाणा, मनोहर वाटखुळे पवनार, वर्धा, यादव जीवतोडे शेम्बळ, चंद्रपूर, रामराव नैताम वाटखेड, यवतमाळ, पुडलिक उखाडे किन्ही, यवतमाळ, रामचंद्र कुम्बलकर वडनेर, वर्धा, रघुनाथ इंगळे खालेगाव, बुलढाणा, मांगीलाल आडे मनोरा, वाशीम देवीदास तायडे अहमदाबाद अमरावती, बळीराम भाटकर, मोरझडी, अकोला, शालिक गेडाम वाठोडा, यवतमाळ, विलास गावंडे कलाशी अमरावती, देवीदास केट धनज, वाशिम, बापूराव झाडे रावेरी यवतमाळ, रामेश्वर जामनिक कलाशी, अमरावती, पुंडलिक सुकलकर दाभा पहूर यवतमाळ, प्रमोद गावंडे उटी यवतमाळ, मनोहर कलंगी सलाई वर्धा, आनंदा राठोड बोथबोडण यवतमाळ, गणेश वाघ पेणटाकली बुलढाणा, यवतमाळ जिल्हयातील बोरीअरबचे श्रीकृष्ण इंगळे, टाकळीचे भाऊराव बंडेकर व बिटरगावचे राजाराम भलगे या तीन शेतकऱ्यांचा तर वाशीम जिल्हयातील काक येथील महिला शेतकरी दुर्गाबाई देशमुख व मुंगडा येथील संदीप शेळके या दोन शेतकऱ्यांच्या व अमरावती जिल्हयातील पापडचे अजय खाप्रीकर या ३८ शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. जेमतेम पाच लाख शेतकऱ्यांना बँकांनी नवीन पीककर्ज दिल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)