दोन दिवसात हिशेब सादर करा अन्यथा निलंबन
By Admin | Updated: June 10, 2015 02:30 IST2015-06-10T02:30:59+5:302015-06-10T02:30:59+5:30
खिशात टाकलेला शासनाचा लाखो रुपयांचा निधी दोन दिवसात तिजोरीत जमा करा अन्यथा निलंबन कारवाई केली जाईल, ...

दोन दिवसात हिशेब सादर करा अन्यथा निलंबन
यवतमाळ : खिशात टाकलेला शासनाचा लाखो रुपयांचा निधी दोन दिवसात तिजोरीत जमा करा अन्यथा निलंबन कारवाई केली जाईल, अशी तंबी अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सरदार यांनी जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे.
‘कृषी विभागात एक कोटींच्या निधीची अफरातफर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत सरदार यांनी सोमवारी पुसद येथे कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शासकीय निधी खिशात टाकणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली गेली. तालुका स्तरावरील निधीचा व योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची जबाबदारी तुमची असताना तुम्ही त्याकडे दुर्लक्ष का केले, असा जाब गायकवाड यांना विचारण्यात आला. उमरखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात १५ ते २० लाखांची अफरातफर पुढे आली. ५० टक्के अनुदानावरील शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ दिला गेला. परंतु शेतकऱ्यांनी त्यापोटी भरलेली ५० टक्के रक्कम कृषी अधिकाऱ्यांनी पुरवठादाराकडे जमा न करता आपल्या खिशात ठेवली. अप्रत्यक्षपणे या रकमेचा अपहार केला. पुरवठादारांनी केलेल्या आॅडिटमध्ये एकट्या उमरखेड तालुक्यात ही अफरातफर १५ ते २० लाखांची आणि संपूर्ण जिल्ह्यात एक कोटींवर असल्याचे निष्पन्न झाले. म्हणूनच उमरखेडच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना दोन दिवसात या रकमेचा हिशेब सादर करा अन्यथा निलंबनाचा आदेश पाठविला जाईल, अशी तंबी कृषी सहसंचालक सरदार यांनी दिली.
जिल्ह्यातील अन्य तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही रक्कम भरण्याबाबत समज देण्यात आली. अनेक कृषी कर्मचाऱ्यांनी सन २००९-१० पासून ही रक्कम शासनाच्या तिजोरीत न भरता अथवा साहित्य पुरवठादार मंडळांकडे जमा न करता स्वत:च परस्पर खर्च केली होती. त्याचा गाजावाजा झाल्यानंतर आता कृषी कर्मचाऱ्यांनी निलंबन व फौजदारी कारवाईतून वाचण्यासाठी या रकमेची जुळवाजुळव सुरू केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)