विद्यार्थ्याच्या खुनातील आरोपींना दारव्हा तालुक्यातून अटक
By Admin | Updated: April 29, 2016 02:30 IST2016-04-29T02:30:04+5:302016-04-29T02:30:04+5:30
स्थानिक उमरसरा भागातील संकटमोचन रोडवर बुधवारी सायंकाळी झालेल्या खुनातील तीनही आरोपींना वडगाव रोड पोलिसांनी दारव्हा तालुक्यातील देऊरवाडी (लाड) येथून अटक केली.

विद्यार्थ्याच्या खुनातील आरोपींना दारव्हा तालुक्यातून अटक
उमरसरातील घटना : पूर्ववैमनस्यातून काढला काटा
यवतमाळ : स्थानिक उमरसरा भागातील संकटमोचन रोडवर बुधवारी सायंकाळी झालेल्या खुनातील तीनही आरोपींना वडगाव रोड पोलिसांनी दारव्हा तालुक्यातील देऊरवाडी (लाड) येथून अटक केली.
जय प्रशांत नगरनाईक (१९) रा. आर्णी या महाविद्यालयीन युवकाचा बुधवारी सायंकाळी चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात तीन युवकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये उत्तम आनंदराव जाधव (१९) रा. संकटमोचन रोड उमरसरा, तेजेस संजय गायकवाड (२०) रा. भोसा, सौरभ महादेवराव काळे (१९) रा. संकटमोचन रोड उमरसरा यांचा समावेश आहे. यातील एकाचे आजोबा दारव्हा तालुक्यातील देऊरवाडी येथे राहतात. तेथे या तिघांनी खुनाच्या घटनेनंतर आश्रय घेतला होता. आजोबाकडे या तिघांच्या कृत्याची कुणालाच कल्पना नव्हती. घटनेनंतर अवघ्या दहा तासात वडगाव रोड ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते, जमादार गजानन धात्रक, बबलू चव्हाण, सुरेश कांबळे, बंडू मेश्राम, गौरव नागलकर आदींनी आरोपींना अटक केली. काल सायंकाळी प्राथमिक तपासात या खुनातील नावे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. मोबाईल लोकेशनद्वारे त्यांच्यावर वॉच ठेवला गेला. या तीनही आरोपींचे वय नेमके किती, ते अल्पवयीन तर नाही ना याची खातरजमा पोलिसांकडून केली जात आहे. त्यासाठी त्यांचे शैक्षणिक दाखले मागितले जात आहे. वैमनस्यातून हा खून झाल्याचे सांगितले जाते.
जय प्रशांत नगरनाईक आणि आरोपी नेहरु स्टेडियमवर खेळण्यासाठी जात होते. तेथून त्यांच्यात वर्चस्वावरून वाद सुरू होता. यापूर्वीसुद्धा त्यांचे प्रकरण वडगाव रोड पोलिसांपर्यंत पोहोचले होते. मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करीत त्यांना समज दिली होती. वर्चस्वाच्या या लढाईमागे कुण्या मुलीचे कारण आहे का, या दृष्टीनेही वडगाव रोड पोलीस तपास करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)