राळेगाव वसतिगृहातील विद्यार्थी चार दिवसांपासून उपाशी
By Admin | Updated: September 18, 2014 00:04 IST2014-09-18T00:04:17+5:302014-09-18T00:04:17+5:30
भोजन पुरवठा ठेकेदाराने मेस बंद केल्याने राळेगाव येथील वसतिगृहातील २८ विद्यार्थी गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. वसतिगृह अधीक्षकांनी या विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला तर समाज कल्याण विभाग

राळेगाव वसतिगृहातील विद्यार्थी चार दिवसांपासून उपाशी
अशोक पिंपरे - राळेगाव
भोजन पुरवठा ठेकेदाराने मेस बंद केल्याने राळेगाव येथील वसतिगृहातील २८ विद्यार्थी गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. वसतिगृह अधीक्षकांनी या विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला तर समाज कल्याण विभाग उडवाउडवीची उत्तरे देत आहे.
राळेगाव येथे समाज कल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणारे २८ विद्यार्थी आहे. गेल्या दोन महिन्यांंपासून विद्यार्थ्यांना अनियमित भोजन दिले जात होते. तसेच सकस आहारही पुरविला जात नव्हता. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले होते. अर्धपोटी उपाशी राहून शाळेत जात होते. आता तर १३ सप्टेंबरपासून वसतिगृहाला भोजन पुरविणाऱ्या ठेकेदाराने आपली मेसच बंद केली. विशेष म्हणजे मेसचे कंत्राट १५ आॅगस्ट रोजीच संपले होते. परंतु कंत्राटदाराने मानवतेच्या दृष्टीकोणातून इतके दिवस विद्यार्थ्यांना भोजन दिले. आता मेस बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान भोजन मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. यातील बहुतेक विद्यार्थी दहावी-बारावीतील असून अभ्यास बुडणार असल्याने गावाकडे कसे जावे असा प्रश्न आहे. याबाबत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याला विचारले असता आपण राळेगाव वसतिगृहाच्या अधीक्षकांशी चर्चा करतो, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. या विद्यार्थ्यांनी राळेगाव तहसीलदारांना निवेदन दिले.