विद्यार्थ्यांनी बससाठी केले आंदोलन

By Admin | Updated: July 30, 2015 02:16 IST2015-07-30T02:16:25+5:302015-07-30T02:16:25+5:30

शिरपूर येथील श्री.गुरूदेव विद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी बोरगाव व खांदला बसस्थानकावर एस.टी.बस थांबत नसल्याने बसच रोखून धरली.

The students did the movement for the bus | विद्यार्थ्यांनी बससाठी केले आंदोलन

विद्यार्थ्यांनी बससाठी केले आंदोलन

ठाणेदार-प्राचार्यांची मध्यस्थी : सामाजिक मित्र संघटनेचा पाठिंबा
वणी : शिरपूर येथील श्री.गुरूदेव विद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी बोरगाव व खांदला बसस्थानकावर एस.टी.बस थांबत नसल्याने बसच रोखून धरली. विद्यार्थी व वाहन चालकामध्ये अखेर बाचाबाची झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करूनच मार्ग काढावा लागला.
तालुक्यातील शिरपूर येथील श्रीगुरूदेव उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी आणि बारावीत परिसरातील ढाकोरी, कुरई, डोर्ली, वेळाबाई, मोहदा, कृष्णानपूर, बोरगाव, खांदला, गोपालपूर येथील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आह. या सर्व विद्यार्थ्यांना गावावरून शिरपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणाकरिता येण्यासाठी एस.टी.चे सवलत पास काढले. मात्र या मार्गावर कोरपना-वणी ही एकच बस सकाळी उपलब्ध आहे. या एका बसमध्ये सर्व विद्यार्थी सामावले जात नाही. त्यामुळे वेळाबाई, बोरगाव, खांदला या थांब्यावर कधी-कधी बसही थांबविली जात नाही. परिणामी विद्यार्थी, पालक व प्राचार्यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन सकाळी वणी-कृष्णानपूर बस सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र वणी आगाराकडून ही बस सुरू करण्यात आली नाही.
बुधवारी वणी-कोरपना बसमध्ये जागाच नसल्याने खांदला थांब्यावरील विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास चालक व वाहकाने असमर्थतला दर्शविली. त्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले व विद्यार्थ्यांची चालकाशी बाचाबाची झाली. विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करून चालकाने बस शिरपूर ठाण्यात आणली. यानंतर विद्यार्थ्यांनी सामाजिक मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर संघटनेचे स्वप्नील धुर्वे, नितेश पानघाटे, अ‍ॅड.शेखर वऱ्हाटे, रवी सोमलवार आदी शिरपूर ठाण्यात पोहोचले. तेथे आगार व्यवस्थापक एन.आर.धारगावे, बसस्थानक प्रमुख लता मुळेवार, लिपीक तानाजी पाऊणकर हेसुद्धा पोहोचले. ठाणेदार मनोज केदारे व प्राचार्य वि.ना.ताजने यांनी मध्यस्थी करून शेवटी यावर तोडगा काढला. त्यात विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून दुसऱ्या बसची व्यवस्था केली जाईल, असे आगार प्रमुख धारगावे यांनी सांगितले. मात्र सोमवारपासून बसची व्यवस्था न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा विद्यार्थ्यांतर्फे सामाजिक मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, पंचायत समिती सदस्य दयालाल अरके यांनी आगार प्रमुखांना विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची सूचना केली. वारंवार निवेदन देऊनही उपाययोजना होत नसल्याने बुधवारी शेवटी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावर आता तोडगा निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
एस.टी.ने विद्यार्थ्यांना पास तर दिले, मात्र एवढ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी बस उपलब्ध करून न दिल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागते. तसेच गैरहजेरीचे प्रमाण वाढल्यास पुढील परीक्षेपासून वंचित राहण्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

Web Title: The students did the movement for the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.