बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल
By Admin | Updated: July 25, 2015 02:49 IST2015-07-25T02:49:12+5:302015-07-25T02:49:12+5:30
तालुक्यातील डोल्हारी (देवी), जवळा ब्राह्मनाथ, खोपडी (बु.) या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आल्याने या गावातील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे.

बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल
दारव्हा : तालुक्यातील डोल्हारी (देवी), जवळा ब्राह्मनाथ, खोपडी (बु.) या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आल्याने या गावातील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. तब्बल सहा किमी पायदळ चालू शाळा गाठावी लागत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भात एसटी महामंडळाकडे वारंवार मागणी करण्यात आली. परंतु त्यांनी रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले. जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे रस्ता दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली तर निधी नसल्याचे उत्तर मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाल्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. डोल्हारी (देवी), जवळा, ब्रह्मनाथ या गावात इयत्ता ८ वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणाकरिता दारव्हा किंवा खोपडी (बु.) या ठिकाणी जाव लागते. यापूर्वी बससेवा सुरू असल्याने ये-जा करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होते, परंतु सध्या बसेसवा बंद करण्यात आली. त्यामुळे दारव्हा येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी खासगी वाहनाने शाळेत जातात. तर खोपडी येथे असणारे तीन किमी जाणे व तीन किमी येणे असा पायदळ प्रवास करतात.
विद्यार्थ्यांना खासगी वाहनाचा प्रवास परवडणारा नाही कारण बसची पाससेवा असल्याने तिकीट कमी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहे. डोल्हारी (देवी) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मा पवार यांनी पुढाकार घेऊन बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु एसटी महामंडळाचे व्यवस्थापन रस्ता नादुरूस्त आहे. काही ठिकाणी पूल बांधणे आवश्यक असल्याचे कारण सांगतात गावातील नागरिकांनी लोकवर्गणी व श्रमदान करून खड्डे बुजविले, रस्त्यावरील झाडे तोडली परंतु एसटी महामंडळाचे अधिकारी ऐकायला तयार नाही.
तर दुसरीकडे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे रस्त्याची दुरूस्ती करण्याबाबत निवेदन दिले तेव्हा निधी नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या तिन्ही गावातील विद्यार्थ्यांच्या पालकासमोर आपल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.
(तालुका प्रतिनिधी)