परीक्षेला उशीर झाला विद्यार्थ्याने गळफास लावला
By Admin | Updated: December 2, 2015 02:57 IST2015-12-02T02:57:59+5:302015-12-02T02:57:59+5:30
परीक्षेला उशीर झाल्यामुळे पेपर देता आला नाही, हे शल्य एका विद्यार्थ्याचा जीव घेणारे ठरले.

परीक्षेला उशीर झाला विद्यार्थ्याने गळफास लावला
अभियांत्रिकीचा होता पेपर : सुसाईड नोट लिहिली
नागपूर : परीक्षेला उशीर झाल्यामुळे पेपर देता आला नाही, हे शल्य एका विद्यार्थ्याचा जीव घेणारे ठरले. केडीके अभियांत्रिकीचा विद्यार्थी लीलाधर ज्ञानेश्वर डबले (वय १९) याने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ही हृदयद्रावक घटना नंदनवन ठाण्याच्या हद्दीत घडली.
वर्धा जिल्ह्यातील कवठा-निंबाळा (ता. समुद्रपूर) येथील रहिवासी असलेला लीलाधर नंदनवनमधील राजेंद्रनगरात वासुदेव ठाकरे यांच्याकडे भाड्याने राहात होता. अतिशय हुशार आणि अभ्यासू वृत्तीचा लीलाधर मनाने तेवढाच हळवा होता. अनामिक कारणामुळे त्याला आज परीक्षा केंद्रावर जायला थोडा उशीर झाला. त्यामुळे त्याला पेपर देता आला नाही. गयावया करूनही फायदा झाला नाही. आपले एक वर्ष विनाकारण वाया जाईल, याचे शल्य लीलाधरला अस्वस्थ करणारे ठरले. तो घरी आला आणि टेरेसवर जाऊन त्याने गळफास लावला.
तत्पूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘पेपर देता आला नाही, त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने नमूद केले‘. लीलाधरचा मित्र राहूल सुनील वर्मा त्याच्या रुमवर गेला. त्याला लीलाधर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्याने आरडाओरड करीत घरमालक आणि शेजाऱ्यांना सांगितले. नंदनवन ठाण्यातही माहिती दिली.
एपीआय कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत लीलाधरला मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे विद्यार्थी वर्तुळात आणि राजेंद्रनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)