फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराने यवतमाळात तणाव
By Admin | Updated: November 6, 2014 23:03 IST2014-11-06T23:03:06+5:302014-11-06T23:03:06+5:30
फेसबुक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याने यवतमाळात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकाराचा निषेध करीत शहरातील दुकाने बंद करण्यात आली.

फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराने यवतमाळात तणाव
व्यापारपेठ बंद पाडली : दोन एसटी बसवर दगडफेक
यवतमाळ : फेसबुक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याने यवतमाळात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकाराचा निषेध करीत शहरातील दुकाने बंद करण्यात आली. तर यवतमाळात येणाऱ्या दोन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. यानंतर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
महामानवाबद्दल आक्षेपार्ह चित्र आणि मजकूर फेसबूकवर प्रसारित झाले. हा प्रकार यवतमाळात माहीत होताच तरुणांनी तीव्र संताप नोंदविला. स्थानिक पाटीपुऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तरुणांचा एक जत्था स्टेट बँक चौकात पोहोचला. या ठिकाणी घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच दुकाने बंद करण्याची घोषणा देण्यात आली.
त्यामुळे स्टेट बँक चौक, मेन लाईन, सराफा बाजार काही क्षणातच बंद झाला. त्यानंतर तरुणांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविण्याची सूचना केली. तरुण पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी तक्रार नोंदविली. यावेळी जमलेल्या तरुणांना पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी शांत केले. त्यामुळे जमाव परत गेला.
मात्र काही वेळानंतर यवतमाळ-धामणगाव मार्गावर एका बसवर दगडफेक करण्यात आली. बसची तोडफोड झाली. परंतु दगडफेक करणाऱ्यांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाही. त्यामुळे ही बस कोणी फोडली, याबाबत पोलीस तपास करीत आहे. दुसरी बस नागपूर राज्य मार्गावर फोडण्यात आली. प्रवाशांना खाली उतरविल्यानंतर तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर सायंकाळी पोलीस अधीक्षकांनी शहराची पाहणी केली. शहरात ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र तोडफोडीची घटना वगळता शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांतता दिसत होती.
समाजामध्ये द्वेष पसरविणाऱ्या या घटनेचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.
मुळात असा प्रकार घडल्यानंतर सर्वांनी शांततेच्या मार्गाने अवलंब करणे गरजेचे आहे. त्यामुळे द्वेष पसरविणाऱ्याचा शोध घेणे सहज सोपे होईल, असे बीएसपीचे निमंत्रक सुनील पुनवटकर, रिपाइंचे जिल्हा प्रवक्ते नवनीत महाजन, बामसेफचे विलास कांबळे, कैलास गोंडाने, संजय बोरकर, अशोक मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनेकांनी यावेळी आपला संताप व्यक्त केला. (शहर वार्ताहर)