मानव विकासमधून आरोग्य सुविधेला बळकटी
By Admin | Updated: June 29, 2015 00:00 IST2015-06-29T00:00:12+5:302015-06-29T00:00:12+5:30
जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सुविधेला अधिक बळकट करण्यासाठी मानव विकास योजनेचा आधार घेतला जाणार आहे.

मानव विकासमधून आरोग्य सुविधेला बळकटी
यवतमाळ : जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सुविधेला अधिक बळकट करण्यासाठी मानव विकास योजनेचा आधार घेतला जाणार आहे. आरोग्य सेवेला अधिक गतिमान बनविण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आढावा बैठक घेतली. या बैैैैठकीत अधिकाऱ्यांना आरोग्य उपकेंद्राला आठवड्यातून किमान एक भेट देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी. राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यासह मानव विकास मिशनमधील नऊ तालुक्यांचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना केल्या. आवश्यकता नसताना यासाठी रुग्णांना तालुका किंवा जिल्हास्तरावरील रुग्णालयात पाठविल्या जाऊ नये, प्रसूतीचे रुग्ण किचकट किंवा अन्य कारणास्तवच वरील रुग्णालयात पाठविल्या जावे. उपकेंद्रातील प्रसूतीचे प्रमाण कमी राहिल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
शासकीय रुग्णालयांमध्ये शंभर टक्के लसीकरण करण्यासोबतच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा सत्र मोहिम राबवावी. या मोहिमेंतंर्गत गावपातळीवर गरोदर माता, जोखमी मातांची तपासणी करून त्यांना संदर्भसेवा उपलब्ध करून दिल्या जाव्या. उपकेंद्रातील कामकाजाला गती देण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोनदा सायंकाळी ६ ते ९ च्या दरम्यान उपकेंद्राला भेट द्यावी. तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आठवड्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन उपकेंद्रांना सदर वेळी भेट देण्याची सूचना केली. यामुळे उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास सवय लागेल, असे ते म्हणाले.
मानव विकास मिशनचा आढावा घेतांना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य शिबीर, बुडीत मजुरी, अभ्यासिका, गरोदर मातांची आरोग्य तपासणी, माती परीक्षण, बालगृह, मानव विकासच्या बस आदींचा आढावा घेतला. मिशनमधून व्यावसायिक प्रशिक्षण दिलेल्या किती उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला याची माहिती सादर करण्याची सूचना त्यांनी केली.
मानव विकास मिशनमध्ये जिल्ह्यातील सोळा तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा आत्महत्याग्रस्त असून नापिकी व दुष्काळाने शेतकरी हवालदिल आहे. मानव विकासमधून बऱ्यापैकी ग्रामीण पातळीवर सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे. त्यासाठी सर्व तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्यासोबतच उर्वरित सात तालुके मिशनमध्ये समाविष्ट करण्याचीे सूचना त्यांनी केली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत नाराजी व्यक्त करत ही संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागास दिले. (कार्यालय प्रतिनिधी)