कृषी योजनांचे लिकेज थांबवू

By Admin | Updated: June 11, 2015 02:21 IST2015-06-11T02:20:49+5:302015-06-11T02:21:36+5:30

कृषी विभागाच्या बहुतांश योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. या योजनांमध्ये लिकेजेस असल्याने शासनाच्या चांगल्या योजनांचा लाभ मिळत नाही.

Stop the review of agricultural schemes | कृषी योजनांचे लिकेज थांबवू

कृषी योजनांचे लिकेज थांबवू

सचिंद्र प्रताप सिंह : दाभडी येथे शेतकरी बचाव जनजागृती रॅली
आर्णी : कृषी विभागाच्या बहुतांश योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. या योजनांमध्ये लिकेजेस असल्याने शासनाच्या चांगल्या योजनांचा लाभ मिळत नाही. हे लिकेच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांना दिले. दाभडी येथे शेतकरी बचाव जनजागृती रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी सकाळी बोलत होते.
जिल्ह्यात येऊन मला फक्त २० दिवस झाले. या दिवसात शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी माझ्या लक्षात आल्या आहे. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. आपला शेतकरी हुशार आहे. फक्त त्याला काही सुधारणा करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक गावात दारूबंदी करावी, गावात दारू विक्री होऊ देऊ नये. यामुळे गावातील वातावरण चांगले राहील. शिवाय गावात होणाऱ्या विकास कामाची गुणवत्ता कशी चांगली करून घेता येईल, याकडे काम सुरू असतानाच लक्ष द्यावे. जेणेकरून काम संपल्यानंतर तक्रार करण्याची गरज भासणार नाही, असा संदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दाभडीतील शेतकऱ्यांना दिला.
प्रत्येक शेतकऱ्याने पीककर्ज बँकेतूनच घ्यावे, सावकाराकडून कर्ज घेऊ नये. जिल्ह्यातील आठ रुग्णालयामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार दिला जातो. याचा फायदा घ्यावा. मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची सोय आहे. ते घ्या. त्यासाठी स्वत: व्यक्तिश: प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अन्न सुरक्षा गरजूंनाच मिळाली पाहिजे. यात श्रीमंतांचा समावेश नको. कर्ज काढून लग्न करण्याऐवजी सामूहिक विवाह मेळावे घ्या, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला बगल देऊन भाजीपाला, फुलशेती, बागायत शेती करावी, यासाठी कृषी विभागाची मदत घ्यावी, भाग्य बदलण्याची ताकद फक्त तुमच्या हातात आहे. तुमच्या पैकीही कुणाचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, अशी साद सचिंद्र प्रताप सिंह यांनी घातली.
यावेळी शेतकरी बचाव जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. शेतकरी बचाव जनजागृती समितीच्या संयोजिका ज्योती प्रभाकर जीवने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, दाभडीचे सरपंच संतोष टाके, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, तालुका कृषी अधिकारी एस.जे. पाठक आदी उपस्थित होते. यावेळी दाभडी येथील ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Stop the review of agricultural schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.