प्रत्येक घरात हळहळ.. प्रत्येक दारात रडारड !
By Admin | Updated: April 22, 2016 04:25 IST2016-04-22T04:25:21+5:302016-04-22T04:25:21+5:30
लहानशा गावातला प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या दोस्तान्यातला असतो. खेड्यातला तरुण म्हणजे तर गावाचा आधारच. पण, हर्षी

प्रत्येक घरात हळहळ.. प्रत्येक दारात रडारड !
प्रकाश लामणे ल्ल पुसद
लहानशा गावातला प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या दोस्तान्यातला असतो. खेड्यातला तरुण म्हणजे तर गावाचा आधारच. पण, हर्षी आणि चिलवाडी या दोन गावांनी बुधवारी तब्बल सात तरुणांचे आधार गमावले. या तरुणांचे कलेवर एकत्र ठेवून अग्नी देताना सानथोर गावकऱ्यांचे डोळे पाझरे अन् काळीज द्रवले. उन्हाळा असूनही गावकऱ्यांची तहान-भूक हरविली. प्रत्येक घरात हळहळ.. प्रत्येक दारात रडारड अशी विदारक स्थिती होती. बुधवारच्या त्या भयाण रात्री जड अंत:करणाने सात होतकरू जिवांवर अंत्यसंस्कार झाले.
पुसद-उमरखेड मार्गावरील साई मंदिरासमोर बुधवारी दुपारी दीड वाजता दोन भरधाव दुचाकी परस्परांवर आदळल्या. त्यात हर्षी आणि चिलवाडी गावातील सात तरुण दगावले. यातील युवराज तुकाराम गुव्हाडे (२७), बाळू तुकाराम गुव्हाडे (३५), यादव साहेबराव ठाकरे (२२) आणि शेषराव नारायण काळे (४५) हे चौघे हर्षीचे होते. तर खंडू राजाराम तांबारे (२१), विलास राजाराम काळे (२२) आणि रवी नारायण कऱ्हाळे (२५) हे तिघे चिलवाडीचे रहिवासी होते.
हर्षीचे चार तरुण दुचाकीने पुसदकडे निघाले होते. त्याचवेळी चिलवाडीचे तीन तरुण दुचाकीनेच पुसद ओलांडून हर्षीकडे निघाले होते. दरम्यान, या तरुणांनी ट्रॅक्टरला (एमएच २९ व्ही ४२६२) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. पण अंदाज चुकला आणि अचानक दोन्ही दुचाकी परस्परांवर आदळल्या. धडक एवढी जबरदस्त होती की, पाच तरुण जागीच गतप्राण झाले. अन्य दोघे उपचारादरम्यान दगावले. ही वार्ता कळताच दोन्ही गावात चूल पेटली नाही.
सातही मृतदेह पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले. डॉ. पी. एस. चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. आमदार मनोहरराव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग आदींनी शवविच्छेदनगृहाला भेट देऊन आवश्यक त्या सूचना केल्या.
शवविच्छेदनानंतर सातही तरुणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. मेटॅडोरमधून हर्षीचे तर पोलीस व्हॅनमधून चिलवाडीचे मृतदेह गावात धडकले, त्यावेळी एकच रडारड उसळली. हर्षीच्या स्मशानभूमीत रात्री ८ वाजता चौघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश धनवे, पोलीस पाटील विजय खंदारे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तर चिलवाडीच्या स्मशानभूमीत रात्री ९ वाजता तिघांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. अख्खा गावच रडत होता. अश्रूंचे बांध फुटले होते. एकाच वेळी सात तरुणांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण पुसद तालुकाच हादरून गेला.
पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, शहरचे ठाणेदार अनिल कुरळकर, वसंतनगरचे ठाणेदार सदानंद मानकर, पोफाळीचे ठाणेदार ठाकूर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत राऊत आदींनी मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द केले. त्यावेळी पोलिसांचे कठोर मनही हेलावून गेले होते.
सात कुटुंबांचे आधार गेले
मृतांपैकी पाच जण अविवाहित होते. रवी कऱ्हाळे यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. रोजमजुरी करून कुटुंब जगविणाऱ्या रवीच्या जाण्याने त्याचे आईवडील, पत्नी, बहीण, दोन भाऊ असे कुटुंब उघड्यावर आले आहे. तर शेषराव काळे यांच्या मृत्यूमुळे पत्नी, सात मुली, एक मुलगा हे कुटुंब पोरके झाले. खंडू तांभारे नवव्या वर्गात होता. त्याच्या रूपाने आईवडीलांचा एकुलता एक आधार गेला. विलास काळे हा देखील अकरावीत होता. अपघाताने असे कोवळे जीव हिरावले. सात कुटुंबांचे आधारस्तंभ हिसकावून घेतले. त्यामुळे चिलवाडी आणि हर्षी या गावांच्या कळवळण्याला अंतच नव्हता. विशेष म्हणजे मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ, एक आतेभाऊ आणि एक मावसा होता.