पर्यटकांची पावले वळली सहस्त्रकुंडकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:52 IST2019-08-05T23:52:11+5:302019-08-05T23:52:39+5:30
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील निसर्गनिर्मित धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचे पावले सहस्त्रकुंकडे वळू लागली आहे. तेथील महादेवाच्या दर्शनासाठीही भक्तांची संख्या वाढली आहे. मात्र या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची गरज आहे.

पर्यटकांची पावले वळली सहस्त्रकुंडकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील निसर्गनिर्मित धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचे पावले सहस्त्रकुंकडे वळू लागली आहे. तेथील महादेवाच्या दर्शनासाठीही भक्तांची संख्या वाढली आहे. मात्र या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची गरज आहे.
सहस्त्रकुंड धबधब्याने आता आक्राळविक्राळ रूप घेतले आहे. परिसरात निसर्ग नटला आहे. मात्र धबधबास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांची कमतरता आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवून पर्यटकांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. सेल्फीच्या नादात अनेक युवक थेट नदी पात्र व कुंडाच्याकडेला जातात. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी होऊ लागल्याने पर्यटकांना सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य बघणे दुर्लभ झाले होते. गतवर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने धबधबा वाहीला. मात्र अल्पावधीतच तो लुप्त झाला होता. यंदाही दीड महिन्यांच्या विलंबाने दमदार पावसाला सुरुवात झाली अन् आता धबधबा फेसाळला आहे. यंदा प्रथमच २००६ नंतर सहस्त्रकुंड एवढ्या मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहात आहे. पर्यटन विकास महामंडळाने तेथे उंच मनोरे, प्रवासी निवास यासह अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहे. परिसरातील झाडे, झुडपे हिरवाईने नटले आहे. येथे वनविभागाचे उद्यान झाल्याने हे पर्यटनस्थळ अधिक मोहीत करीत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यटनाच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक आता सवड मिळताच सहस्त्रकुंडकडे वळू लागले आहे. मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक आदीसह दूरवरून अनेक कुटुंब, युवक मित्रांसह धबधब्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. दरम्यान या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरेसा पोलीस बंदाबस्त नाही. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात या ठिकाणी जवळपास ७ ते ८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर काही दिवस पोलीस बंदोबस्त ठेवून पुन्हा तो कमी करण्यात आला होता.
कुंडात पोहोण्याचा मोह आवरा
दोन वर्षांपूर्वी आॅगस्ट महिन्यात पोहोण्याचा मोह न आवरलेल्या एका युवकाचा तोल जाऊन कुंडात पडल्याने मृत्यू झाला होता. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, अशी अपेक्षा रविवारी येथे आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केली. मात्र पर्यटकांनीही कुंडात पोहोण्याचा मोह आवरायला हवा. कुंडातील अथांग पाण्याचा कुणालाच अंदाज येत नाही. त्यात सध्या पैनगंगा नदी दुथडी भरून वाहात असल्याने पाण्याचा प्रवाह मोठा आहे. वाहत्या पाण्यात वाहून जाण्याचाही धोका असतो. त्यामुळे पर्यटकांनीही काळजी घेणे गरजेचे झाले आहे.