‘एसटी’ महामंडळाच्या दुकानांनी करार मोडला
By Admin | Updated: June 18, 2016 01:57 IST2016-06-18T01:57:13+5:302016-06-18T01:57:13+5:30
उत्पन्न वाढण्यासोबतच प्रवाशांना परिसरातच वस्तू उपलब्ध व्हाव्या यासाठी एसटी महामंडळाने दुकान गाळे बांधले.

‘एसटी’ महामंडळाच्या दुकानांनी करार मोडला
पसारा वाढविला : कारवाईचा सपाटा सुरू
यवतमाळ : उत्पन्न वाढण्यासोबतच प्रवाशांना परिसरातच वस्तू उपलब्ध व्हाव्या यासाठी एसटी महामंडळाने दुकान गाळे बांधले. लिलावाद्वारे ही दुकाने चालविण्यासाठी देण्यात आली. ठरवून दिलेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागा वापरात आणू नये, असा करार भाडेधारकांशी करण्यात आला. मात्र त्यांनी कराराचा भंग करत अतिक्रमण केले आहे. राज्यभरातील आगारांमध्ये एकूण ७६५ जणांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या अतिक्रमणाने होणारा त्रास लक्षात घेता महामंडळाने कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.
बसस्थानकाचा आवार आणि बाह्य भागामध्ये महामंडळाने दुकान गाळे काढले आहेत. गाळे देताना करार करण्यात आला आहे. त्यामध्ये ठरवून दिलेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागा वापरली जावू नये, हा प्रमुख मुद्दा आहे. हॉटेल, बुक स्टॉल, रसवंती, पानठेला, स्टेशनरी आदी प्रकारची दुकाने या गाळ्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. काही गाळेधारकांनी कराराचे उल्लंघन करत अतिरिक्त जागा व्यापली आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना होणारा त्रास आणि महामंडळाच्या बसेसच्या चालक-वाहकांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे किती ठिकाणी गाळेधारकांनी अतिक्रमण केले याची तपासणी करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी विनित अग्रवाल यांनी काढले. या आदेशानुसार राज्यभरात असलेल्या बसस्थानकावरील दुकान गाळ्यांची तपासणी करण्यात आली. यात ७६५ लोकांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. करारात ठरवून दिलेल्या जागेपेक्षा किती तरी अधिक जागा त्यांनी वापरात घेतल्याची बाब पुढे आली. वाढलेले अतिक्रमण तत्काळ काढावे, शिवाय अतिरिक्त जागेची रक्कम वसूल करावी, असे आदेश मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी काढले. या आदेशावरून राज्यभरातील अतिक्रमण काढण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. (वार्ताहर)