भावना गवळी चौथ्यांदा विजयी
By Admin | Updated: May 17, 2014 00:29 IST2014-05-17T00:29:10+5:302014-05-17T00:29:10+5:30
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सर्व अंदाज मोडित काढीत ९३ हजार ८१६ मताधिक्याने विजय संपादित केला. त्यांना चार लाख ७७ हजार ९0५ मिळाली.

भावना गवळी चौथ्यांदा विजयी
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सर्व अंदाज मोडित काढीत ९३ हजार ८१६ मताधिक्याने विजय संपादित केला. त्यांना चार लाख ७७ हजार ९0५ मिळाली. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा पराभव करीत त्या चौथ्यांदा लोकसभेत पोहोचल्या आहेत. देशात असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या झंझावाताने त्यांच्या मताधिक्यात मोठी भर पडली. शिवाजीराव मोघे यांना तीन लाख ८४ हजार ८९ मते, बसपाचे बळीराम राठोड यांना ४८ हजार ९८१ मते तर मनसेचे राजू पाटील राजे यांना २६ हजार १९४ मते मिळाली. भावना गवळी यांनी वाशिमच्या होमपीचवर आपले वर्चस्व सिद्ध करीत कारंजा, राळेगाव, दिग्रस, यवतमाळ येथूनही मताधिक्य घेतले. एकमेव पुसद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळविता आली. २00९ च्या तुलनेत भावना गवळी यांच्या मताधिक्यात वाढ झाली. त्यांनी काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा पराभव करीत त्यावेळी ५६ हजार ९५१ मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत आघाडीत मोठी वाढ झाली आहे. देशात सर्वत्र असलेल्या काँग्रेस विरोधी लाटेचाही फायदा भावना गवळी यांना या निवडणुकीत मिळाला. महागाई, बेरोजगारी, अतवृष्टी, गारपीट, भारनियमनामुळे सर्वसामान्य त्रस्त झाला होता. याच स्थितीचा फायदा गवळी यांना मिळाला. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरूनच सुरुवातीला स्पर्धा दिसत होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे आपले पूत्र राहुलसाठी आग्रही होते. मात्र ऐनवेळेवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समावेश नसलेल्या आणि केळापूर-आर्णी विधानसभेचे नेतृत्व करणार्या सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. या उलट भावना गवळी आपली तिकीट पक्की समजून प्रचाराला लागल्या होत्या. त्यांनी गावान्गाव पिंजून काढले. तर मोघे यांना कमी वेळात मतदारापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. या निवडणुकीत नव्यानेच लोकसभेच्या आखाड्यात उतरलेल्या मनसेला प्रभाव पाडता आला नाही. बहुजन समाज पार्टीच्या बळीराम राठोड यांचा हत्ती ५0 हजाराच्या आतच थांबला. या निवडणुकीत सरळ लढत होऊन मतविभागणीत कोणताही उमेदवार महत्वाचा ठरला नाही. परिणामी पुन्हा शिवसेनेच्या गळ्यात विजयाची माळ पडली. (कार्यालय प्रतिनिधी)